धाेडराज मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:30 IST2021-01-09T04:30:09+5:302021-01-09T04:30:09+5:30

गडचिरोली : सेमाना परिसरात वन विभागाचे उद्यान असल्याने या परिसरात पहाटे व सायंकाळच्या सुमारास ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ...

Dhadraj Marg | धाेडराज मार्ग

धाेडराज मार्ग

गडचिरोली : सेमाना परिसरात वन विभागाचे उद्यान असल्याने या परिसरात पहाटे व सायंकाळच्या सुमारास ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या परिसरात हायमॉस्ट लावण्याची मागणी आहे.

धोडराज मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

भामरागड : भामरागडवरून धोडराज पाच कि.मी. अंतरावर आहे. दरम्यानच्या मार्गावर खड्डे पडले आहेत. मागील सात वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आली आहे.

दुतर्फा अस्ताव्यस्त वाहने

कुरखेडा : कुरखेडा मार्ग, तसेच विश्रामगृह परिसरात नेहमीच पार्किंग केलेली वाहने रस्त्याच्या कडेला दिसून येतात, तर दुसऱ्या बाजूला मालवाहू ट्रक उभे करून त्यातील माल उतरविण्यापासून सर्व कारभार गडचिरोली आगारातील अनेक बसेसमध्ये घाण पसरली आहे.

शाैचालयाचा वापर नाही

आलापल्ली : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे; मात्र ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाही. परिणामी शौचालय बेकामी झाले आहेत. शौचालयाचा वापर न झाल्याने हागणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे. याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे.

कुटुंब नियोजनाबाबत जनजागृतीची गरज

गडचिरोली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजन महिला आघाडीवर आहेत. पुरुषांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.

कमलापूर परिसरातील भ्रमणध्वनी सेवा कुचकामी

कमलापूर : अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरात शासनातर्फे भारतीय दूरसंचार निगमची भ्रमणध्वनी सेवा सुरू करण्यात आली. करोडो रुपये खर्च करून रेपनपल्ली येथे बीएसएनएल भ्रमणध्वनी सेवेचा मनोरा उभारण्यात आला. मात्र, हा टॉवर रेंज राहत नसल्याने भ्रमणध्वनी सेवा कुचकामी ठरली आहे. परिणामी जनता त्रस्त झाली आहे.

तंटे मिटविण्यात समित्या अपयशी

धानोरा : तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांमध्ये तंटामुक्त समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. गावात भांडण, तंटे वाढत आहेत. मात्र समित्या तंटे मिटविण्यात अपयशी ठरत आहेत. जिल्ह्यातील तंटामुक्त समित्या प्रेमीयुगुलांचे विवाह लावून देण्यात पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे.

मार्गाच्या बाजूला वाहने ठेवणाऱ्यांवर कारवाई करा

गडचिरोली : शहरातील चारही मुख्य महामार्गांच्या बाजूला ट्रक व इतर वाहने उभी ठेवली जातात. अनेकांकडे जागा नसतानाही वाहने खरेदी केली आहेत. रात्रंदिवस रस्त्यावर वाहने राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या वाहनांवर कारवाई करावी.

दुर्गम भागात कर्मचाऱ्यांचे अपडाऊन सुरू

धानोरा : धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील, तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी कर्तव्याला दांडी मारली. त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडली आहेत. मुख्यालयाची सक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

जळाऊ कोळशाचे भाव कडाडले

आष्टी : बहुतांश नागरिक अंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी कोळशाच्या शेगडीचा वापर करीत आहेत. या शेगडीने अत्यंत कमी खर्चात पाणी गरम होते. त्यामुळे शेगडी पेटविण्यासाठी कोळशाचा वापर केला जातो.

राजपूर व बोरीतील डुकरांचा बंदोबस्त करा

अहेरी : राजपूर पॅच व बोरी परिसरात मोकाट डुकरांचा प्रकोप वाढला आहे. या भागातील नागरिक डुकरांच्या हैदोसामुळे त्रस्त झाले असल्याने त्यांचा बंदोबस्त त्वरित करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. डुकरांच्या हैदोसामुळे लहान मुलेही भयभित झाले आहेत.

बालकांची आरोग्य तपासणी थंडबस्त्यात

गडचिरोली : अंगणवाडीतील बालके व शाळांमधील विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी स्वतंत्र बाल स्वास्थ पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, भामरागडसह अनेक तालुक्यांतील पथकात डॉक्टरच उपलब्ध नाही. त्यामुळे बालकांची आरोग्य तपासणी रखडली आहे. पथकात डॉक्टरसह इतरही कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

भरधाव वाहनांवर कारवाई करा

आलापल्ली : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र, अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे अनेक अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

केरोसीनअभावी ग्रामीण भागात अडचण

गडचिरोली : ज्या नागरिकांकडे सिलिंडर उपलब्ध आहे, अशा नागरिकांना केरोसीनचा पुरवठा करणे शासनाने बंद केले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. मात्र, केरोसीन बंद झाल्याने दिवा कसा लावावा, असा प्रश्न आहे. गॅस मिळाला असला तरी थंडीच्या दिवसात अनेकजण चुलीवर पाणी गरम करतात.

Web Title: Dhadraj Marg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.