उपवन विभागांची निर्मिती होणार
By Admin | Updated: September 29, 2014 23:06 IST2014-09-29T23:06:02+5:302014-09-29T23:06:02+5:30
प्रशासनात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टिकोनातून महसूल विभागाच्या धर्तीवर वन विभागातसुद्धा उपवनविभागाची निर्मिती केली जाणार आहे. एका उपवन विभागात तीन वनपरिक्षेत्र कार्यालयांचा समावेश आहे.

उपवन विभागांची निर्मिती होणार
गडचिरोली : प्रशासनात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टिकोनातून महसूल विभागाच्या धर्तीवर वन विभागातसुद्धा उपवनविभागाची निर्मिती केली जाणार आहे. एका उपवन विभागात तीन वनपरिक्षेत्र कार्यालयांचा समावेश आहे.
गडचिरोली वनवृत्त कार्यालयाच्या अंतर्गत गडचिरोली, देसाईगंज, आलापल्ली, भामरागड व सिरोंचा हे पाच वन विभाग आहेत. मात्र ज्या जिल्ह्यामध्ये जंगलाचे प्रमाण कमी आहे. अशा जिल्ह्यात तीन ते चार जिल्ह्यांचा मिळून एक वनवृत्त कार्यालय तयार करण्यात आले आहे. व एका जिल्ह्यामध्ये एकच वनविभाग आहे.
भौगोलिक क्षेत्र मोठे राहत असल्याने सदर जंगालाची पाहणी करणे, अशक्य होऊन बसत होते. त्याचबरोबर प्रशासनात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टिकोनातून उपवनविभाग निर्मिती करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. यानुसार गडचिरोली वनविभागात धानोरा व गडचिरोली हे दोन उपविभाग निर्माण केले जाणार आहेत.
देसाईगंज वन विभागात देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा या तीन ठिकाणी उपवनविभागाचे कार्यालय स्थापन केले जाणार आहे. आलापल्ली वन विभागात घोट, आलापल्ली, भामरागड वन विभागात एटापल्ली, भामरागड तर सिरोंचा वनविभागात जिमलगट्टा, कमलापूर, सिरोंचा या ठिकाणी उपवन विभागांची निर्मिती केली जाणार आहे.
सहायक वनसंरक्षक हे वनविभागातील गट ‘अ’ चे पद असून वनांचे रक्षण, संवर्धन व व्यवस्थापनाची जबाबदारी सहायक वनसंरक्षकांवर राहते. त्यासाठी त्यांच्या दिमतीला वन कर्मचाऱ्यांचा ताफा राहतो. मात्र त्यांना कार्यालय प्रमुखाचा दर्जा राहत नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. सहायक वनसंरक्षकांना त्यांचे कर्तव्य अधिक प्रभावीपणे पार पाडता यावे, यासाठी त्यांना कार्यालय प्रमुख म्हणून दर्जा दिल्या जाणार आहे.
महसूल विभागाप्रमाणेच वन विभागातही उपविभागांची निर्मिती करण्यात आली आहे. वनपरिक्षेत्र कार्यालयांना वनविभाऐवजी उपवन विभाग कार्यालयाकडे कामाचा अहवाल द्यावा लागणार आहे. यामुळे वेळेची बचत होण्यास फार मोठी मदत होणार आहे. या निर्णयामुळे वन विभागाचे प्रशासन गतिमान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण जास्त असल्याने येथील कर्मचाऱ्यांवर कामाचा भार अधिक आहे. हा भार उचलण्यासाठी उपवन विभागातील कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभणार आहे. (नगर प्रतिनिधी)