गडअहेरीवासीयांची पाण्यासाठी वणवण
By Admin | Updated: July 25, 2016 01:34 IST2016-07-25T01:34:11+5:302016-07-25T01:34:11+5:30
अहेरी नगर पंचायतीच्या क्षेत्रात येणाऱ्या गडअहेरी येथे नळ पाणी पुरवठा योजनेची दोन ते तीन वर्षापूर्वी योजनेची पाणी टाकी बांधण्यात आली.

गडअहेरीवासीयांची पाण्यासाठी वणवण
पावसाळ्यात पाणीटंचाई : नळ योजना व हातपंप बंद
अहेरी : अहेरी नगर पंचायतीच्या क्षेत्रात येणाऱ्या गडअहेरी येथे नळ पाणी पुरवठा योजनेची दोन ते तीन वर्षापूर्वी योजनेची पाणी टाकी बांधण्यात आली. मात्र सदर नळ योजना बंद आहे. तसेच येथील हातपंपही बंद आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात गडअहेरी परिसरात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी एक किमीची पायपीट करावी लागत आहे.
गडअहेरी येथे दोन ते तीन हातपंप आहे. मात्र सदर हातपंप बंद असल्याने येथून पाणी येत नाही. प्रकाश गलबले यांच्या घराजवळील असलेले हातपंप बसविल्या दिवसापासून बंद आहे. याशिवाय येथील नळ पाणी पुरवठा योजना बंद असून पाण्याची टाकी शोभूची वस्तू बनली आहे. त्यामुळे महिलांना पिण्याचे पाणी अहेरी येथून न्यावे लागत आहे. तसेच इतर कामाच्या वापरासाठीचे पाणी गडअहेरी नाल्यावरून आणावे लागत आहे. ७ ते १३ जुलैदरम्यान अहेरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस बरसला. ऐन पावसाळ्यात गडअहेरी येथे पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांनी अहेरी नगर पंचायत प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे. बंद पडलेली गडअहेरी येथील पाण्याची टाकी सुरू करण्यात यावी, तसेच बंद असलेले हातपंप तत्काळ दुरूस्त करण्यात यावी, अशी मागणी गडअहेरी येथील नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
नगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष
अहेरी नगर पंचायतीच्या हद्दीत गडअहेरी हा परिसर येतो. या परिसरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. नळ पाणी पुरवठा योजना व हातपंप बंद असल्याने येथे ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या संदर्भात तक्रार करूनही अहेरी नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करण्यात आली नाही. प्रशासनाचे दुर्लक्षच आहे.