शिक्षकांना रूजू करण्यास संस्थांचा नकार
By Admin | Updated: February 2, 2015 23:05 IST2015-02-02T23:05:13+5:302015-02-02T23:05:13+5:30
शिक्षण हक्क कायद्यानुसार अतिरिक्त ठरलेल्या खासगी शाळांमधील शिक्षकांना रूजू करून घेण्यास शैक्षणिक संस्थांनी नकार दिला आहे. त्यामुळे या शिक्षकांसमोर फार मोठा पेच निर्माण झाला आहे.

शिक्षकांना रूजू करण्यास संस्थांचा नकार
गडचिरोली : शिक्षण हक्क कायद्यानुसार अतिरिक्त ठरलेल्या खासगी शाळांमधील शिक्षकांना रूजू करून घेण्यास शैक्षणिक संस्थांनी नकार दिला आहे. त्यामुळे या शिक्षकांसमोर फार मोठा पेच निर्माण झाला आहे.
राज्यशासनाने केंद्राचा शिक्षण हक्क कायदा राज्यात लागू केला. शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमधील शिक्षकांची व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या ठेवण्याच्या उद्देशाने मागील तीन महिन्यांपूर्वी संपूर्ण राज्यात खासगी शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेनुसार गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ९० शिक्षक अतिरिक्त ठरले. या शिक्षकांना ज्या खासगी शाळांमध्ये जागा रिक्त आहेत, त्या शाळांमध्ये नियुक्ती देण्यात आली. संबंधित संस्थेने सदर कर्मचाऱ्याला रूजू करून घ्यावे व शाळेच्या वेतन देयकामध्ये संबंधित शिक्षकाच्या वेतनाचा समावेश करून वेतन देयके सादर करण्याचे निर्देश दिले. एकूण ९० समायोजीत शिक्षकांपैकी ८० शिक्षकांना शैक्षणिक संस्थांनी रुजू करून घेतले. मात्र १० शिक्षकांना रूजू करून घेण्यास काही शिक्षण संस्थांनी नकार दिला आहे. सदर शिक्षक नियमितपणे संबंधित शाळेत जाऊनही त्यांच्याकडे कोणतेही शैक्षणिक कार्य सोपविण्यात आले नाही. शिक्षण विभागाने या संस्थाचालकांना कारवाईची सक्त ताकीत देऊनही संस्थाचालक आपल्या हेक्यावर ठाम आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारत संबंधित शाळेमधील संपूर्ण कर्मचाऱ्यांचेच वेतन थांबविले आहे. संस्थाचालकाच्या मनमानीचा त्रास शिक्षकांना भोगावा लागत आहे.
मागील दोन महिन्यांपासूनचे वेतन थकले असल्याने शिक्षकांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे. शिक्षण विभाग व संस्थाचालकांच्या भांडणात शिक्षकवर्ग पिसला जात आहे. (नगर प्रतिनिधी)