जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST2021-04-20T04:37:36+5:302021-04-20T04:37:36+5:30
आलापल्ली : शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत ...

जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई
आलापल्ली : शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतर ही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. खमनचेरू प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येते.
घाण पाण्याच्या गटाराने डास वाढले
गडचिरोली : स्थानिक नगरपालिका क्षेत्रात विविध वॉर्डात मोकळ्या भूखंडावरून घाण पाण्याची डबकी तसेच गटारे निर्माण झाली आहेत. या गटारांच्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. परिणामी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जंतुनाशक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोर्ला बसस्थानकावर गतिरोधकाची गरज
गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी आहे.
खरपुंडी मार्गावर पथदिवे लावा
गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्ड पर्यंत वीज तारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाहीत. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी आहे.
कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती केव्हा होणार?
गडचिरोली : सिंचाई विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत आले आहेत. नदी, नाले, तलाव, बोड्या असूनही बंधारे योग्य नसल्याने व्यवस्था अपुरी आहे.
मोडकळीस आलेल्या शाळांची दुरुस्ती करा
सिरोंचा : तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक शाळांच्या इमारतींना ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत पोहोचल्या आहेत. या इमारतींचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधण्याची मागणी आहे.
शहरातील पक्के अतिक्रमण कायमच
आलापल्ली : शहरातील चारही प्रमुख मार्गांवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली. मात्र या चारही मार्गांवर पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमण ही मोठ्या प्रमाणात आहे.
कृषिपंप अजूनही विजेच्या प्रतीक्षेत
देसाईगंज : शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पंप देण्यात आले. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही वीज जोडणी मिळाली नाही.
ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र वीजचोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात कार्यक्रम दरम्यान विजेच्या तारांवर आकडे टाकून वीजचोरी केली जात आहे.
मद्यपी वाहनचालकांवरील कारवाई थंडबस्त्यात
गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
कोरची शहरात फवारणीकडे दुर्लक्ष
कोरची : शहरातील विविध वॉर्डात अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजारी लोकांची संख्या वाढत चालली आहे.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
आष्टी : वीज वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौर दिवे लावले आहेत. मात्र यातील बहुतांश सौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौर दिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्या, अशी मागणी आहे.
वनहक्क पट्ट्यांपासून नागरिक वंचित
कोरची : शासनाने वनहक्क अधिनियम २००६ अन्वये वन जमिनीचे पट्टे देण्याचे धोरण अमलात आणले आहे. मात्र कागदपत्रांच्या अटीमुळे अद्यापही जिल्ह्यातील अनेक गरजू व गरीब नागरिक वन हक्काच्या पट्ट्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.
मोकाट जनावरांमुळे रहदारी बाधित
आष्टी : शहरातील मुख्य मार्गावर मोकाट जनावरे मधोमध उभी राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गावर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
आवश्यकतेच्या ठिकाणी विद्युत खांब द्या
धानोरा : तालुक्यातील चव्हेला, मुंगनेर येथे वाढीव विद्युत खांब लावून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसापासून मागणी केली जात आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागात रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरते.
भेंडाळा बसस्थानकावर गतिरोधक उभारा
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बसस्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूल मार्गे तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. गतिराेधक निर्माण केल्यास वेगाने धावणाऱ्या वाहनांवर आळा बसण्यास साेयीस्कर हाेणार आहे.
गंजलेल्या विद्युत खांबाने अपघाताचा धोका
आलापल्ली : येथील काही वॉर्डात रस्त्यालगतचे विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे खांब बदलण्याची मागणी होत आहे. जिल्हाभरात अशा प्रकारचे गंजलेले शेकडो खांब आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र या समस्येकडे कायम दुर्लक्ष होत आहे.
हातपंप नादुरुस्त
गडचिरोली : अमिर्झा परिसरातील हातपंप मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. सदर हातपंप दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे, मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून या हातपंपाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
बामणीचा निवारा जीर्ण
सिरोंचा : तालुक्यातील बामणी येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना त्रास होत असल्याने प्रवासी निवाऱ्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील प्रवाशांकडून होत आहे.
पळस वृक्षाची तोड वाढली
धानोरा : गडचिरोली जिल्ह्यात पळसाची अनेक झाडे आहेत. या झाडांच्या पानापासून पत्रावळी तयार केली जाते. सालीमध्ये औषधी गुण आहेत. पळसाच्या झाडावर लाखांचे उत्पादनही घेतले जाते. एकंदरीतच पळसाचे झाड बहुगुणी आहे. त्यामुळे त्याची तोड मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
गोकुळनगरात पोलीस चौकीची मागणी
गडचिरोली : येथील गोकुळनगरात चोरी व गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे येथे पोलीस चौकी निर्माण करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्रीही नगरात वाढली आहे.
झिंगानूर येथे विद्युत उपकेंद्र निर्माण करा
झिंगानूर : येथे विद्युत उपकेंद्र निर्माण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. झिंगानूर पासून ३५ किमी अंतरावर असलेल्या बामणी येथून वीजपुरवठा या परिसरात केला जात आहे. दूरवरून वीजपुरवठा होत असताे.
निराधारांचे अनुदान वाढवा
कुरखेडा : निराधारांना शासनाकडून प्रतिमहा अत्यल्प अनुदान दिले जाते. सदर अनुदान अत्यंत कमी आहे. महागाईमुळे प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा करण्यात येऊनही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई वाढत असल्याने अनुदान तुटपुंजे ठरत आहे.
बाेगस देयके वाढली
गडचिरोली : जिल्हाभरातील काही दुकानदार नकली बिल देऊन ग्राहक व शासनाची फसवणूक करीत आहेत. नकली बिल देणाऱ्या दुकानदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने अनेक दुकानदार बाेगस बिल ग्राहकांना देत आहेत.
रानवाही मार्ग खड्ड्यात
धानोरा : तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या चव्हेला ग्रामपंचायत मधील रानवाही या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. चव्हेला-रानवाही या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने या भागातील वाहनधारक व प्रवाशांची प्रचंड पंचाईत होत आहे. त्यामुळे मार्गाची दुरुस्ती करावी.
अनेक भूखंड रिकामे
गडचिरोली : शहराजवळ शेकडो एकर जागा असून, एमआयडीसीसाठी राखीव करण्यात आली आहे. या परिसरात पाणी, वीज यासारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र बहुतांश भूखंड रिकामेच आहेत. उद्याेग उभारल्यास बेराेजगारांना राेजगार मिळू शकताे.
प्रसूती गृहात सुविधा द्या
आरमोरी : जिल्ह्यातील ३७६ आरोग्य केंद्रांपैकी ३५४ उपकेंद्रांमध्ये प्रसूती गृह बांधण्यात आले आहेत. मात्र सदर प्रसूती गृह अत्यंत लहान असून या प्रसूती गृहामध्ये आवश्यक असलेल्या सोयीसुविधांचा अभाव असल्याने गरोदर मातांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे प्रसूती गृहात सुविधा द्याव्या, अशी मागणी होत आहे.
स्थायी प्राचार्याचा अभाव
वैरागड : चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठांतर्गत दोन्ही जिल्हे मिळून २५० पेक्षा अधिक महाविद्यालये आहेत. यापैकी १०० वर महाविद्यालयात स्थायी प्राचार्य नसून येथे कार्यकारी प्राचार्य असल्याची माहिती आहे. त्यामुळे अडचणी येत आहेत.
जयरामपुरात कव्हरेज गूल
आष्टी : जयरामपूर परिसरातील भ्रमणध्वनी सेवा मागील अनेक दिवसापासून विस्कळीत होत असल्याने या भागातील विविध कंपन्यांच्या भ्रमणध्वनी ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनी मनोऱ्यांची रेंज वाढवावी, अशी मागणी परिसरातील ग्राहकांनी केली आहे.
नदीतील पाणी दूषित
आरमोरी : शहरातील अनेक नागरिक नदीपात्रात निर्माल्य तसेच टाकाऊ पदार्थ टाकतात. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढले आहे. यावर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यातून वैैनगंगा नदी वाहते. या नदीच्या किनाऱ्यावर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो पाणीपुरवठा योजना आहेत.
झुडुपी जंगल शेतीसाठी उपलब्ध करा
गडचिरोली : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झुडुपी जंगल आहे. सदर जंगल शेतकऱ्यांना शेतजमिनीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जमिनीचे तुकडे ही वाढत चालले आहेत. कमी जमिनीत यांत्रिकीकरण करणे शक्य होत नाही.