पुलाअभावी सुरू आहे धोकादायक प्रवास

By Admin | Updated: May 30, 2015 01:59 IST2015-05-30T01:59:43+5:302015-05-30T01:59:43+5:30

एटापल्ली-मुलचेरा मार्गावरील देवदा ते रेगडीदरम्यान असलेल्या दिना नदीवर जिल्हा निर्मितीच्या ३३ वर्षांनंतरही पुलाची निर्मिती करण्यात न आल्याने ...

Dangerous journey is starting to bridge the bridge | पुलाअभावी सुरू आहे धोकादायक प्रवास

पुलाअभावी सुरू आहे धोकादायक प्रवास

एटापल्ली : एटापल्ली-मुलचेरा मार्गावरील देवदा ते रेगडीदरम्यान असलेल्या दिना नदीवर जिल्हा निर्मितीच्या ३३ वर्षांनंतरही पुलाची निर्मिती करण्यात न आल्याने या भागातील शेकडो नागरिक याच नदीतून धोकादायक प्रवास करीत असल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे.
एटापल्लीवासीयांना विविध कामासाठी आलापल्ली मार्गे गडचिरोली येथे जिल्हा मुख्यालयी जावे लागते. हे अंतर १४० किमी आहे. मात्र एटापल्ली मुक्कामी राहणारी एटापल्ली-चिमूर ही महामंडळाची बस अहेरीवरून महागाव मार्गे ये-जा करते. परिणामी या अंतरात पुन्हा १० किमीची भर पडते. त्यामुळे एटापल्ली ते गडचिरोली हे अंतर १५० किमी पडते. दीडशे किमीचा प्रवास करण्यासाठी एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना मोठे प्रवासभाडे मोजावे लागते. तसेच गडचिरोली गाठण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे शेकडो नागरिक पैसा व वेळेच्या बचतीकरिता देवदा ते रेगडीदरम्यान असलेल्या दिना नदीतून प्रवास करतात. एटापल्ली-चंदनवेली-गेदा मार्गावरून मुलचेरा तालुक्यातील देवदा गावावरून चामोर्शी तालुक्यातील रेगडीकडे जाण्यासाठी दिना नदीचाच मार्ग परवडण्यासारखा असून कमी अंतराचा आहे. मात्र शासन व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एटापल्ली व मुलचेरा तालुक्यातील नागरिकांना अद्यापही जीव घेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन दिना नदीवर पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी एटापल्ली भागातील नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
पावसाळ्यात मार्ग होतो बंद
जिल्ह्यात पर्जन्यवृष्टीचे प्रमाण अधिक राहून पूर परिस्थिती निर्माण होते. दिना नदीलाही पावसाळ्यात तीन ते चारदा पूर येतो. मार्ग बंद होत असल्याने देवदा ते रेगडी या गावांचा संपर्क तुटतो. पुरामुळे नागरिकांचा सदर शार्टकट मार्ग बंद होतो.
दिना नदीचा उगम एटापल्ली तालुक्यातून
दिना नदीचा उगम एटापल्ली तालुक्यातील कोटमी परिसरातील जंगल पहाडीतून झाला आहे. दिना नदी मुलचेरा, अहेरी तालुक्यातील अनेक गावांना जाऊन चौडमपल्ली येथील प्राणहिता नदीला मिळते. दिना नदीचा आधार घेऊन रेगडी जलाशयाची निर्मिती करण्यात आली. हे विशेष. कमी अंतराकरिता रेगडी धरणावरून धोकादायक प्रवास होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
पुलाच्या निर्मितीमुळे ५० किमीने अंतर कमी
देवदा-रेगडी दरम्यानच्या दिना नदीवर पुलाचे बांधकाम केल्यास एटापल्ली तालुका गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील ५० किमीचे अंतर कमी होणार आहे. पुलाची निर्मिती झाल्यास एटापल्ली व मुलचेरा भागातील नागरिकांची वेळ व पैशाची बचत होणार आहे.

Web Title: Dangerous journey is starting to bridge the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.