विकासातही सीआरपीएफचा हातभार
By Admin | Updated: August 28, 2016 01:32 IST2016-08-28T01:32:12+5:302016-08-28T01:32:12+5:30
नक्षल्यांचा सामना करण्याबरोबरच सीआरपीएफ ग्रामीण भागाच्या विकासामध्येही सहकार्य करीत असल्याची माहिती सीआरपीएफचे

विकासातही सीआरपीएफचा हातभार
पत्रकार परिषद : सीआरपीएफ महानिरिक्षकांची माहिती; पोलिसांना सहकार्य
गडचिरोली : नक्षल्यांचा सामना करण्याबरोबरच सीआरपीएफ ग्रामीण भागाच्या विकासामध्येही सहकार्य करीत असल्याची माहिती सीआरपीएफचे महानिरिक्षक राजकुमार यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान दिली.
पुढे बोलताना सांगितले की, नक्षल्यांचा सामना करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात पाच बटालियन तैनात करण्यात आल्या आहेत. या सर्व बटालियन स्थानिक पोलिसांना नक्षलविरोधी अभियानात सहकार्य करीत आहेत. कुरखेडा, कोरची या तालुक्यांमधील नक्षलवादाची समस्या कमी झाल्याने देसाईगंजस्थित असलेली कंपनी एटापल्ली येथे हलविण्यात आली आहे. केवळ शस्त्रांच्या भरवशावर नक्षल चळवळ नष्ट होणार नाही. दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासी नागरिकांचा विकास करावा लागेल. त्यांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा पुरवाव्या लागतील. ही बाब लक्षात घेऊन सीआरपीएफच्या वतीने सव्हिक अॅक्शन प्रोग्राम सुरू करण्यात आले आहे. या प्रोग्राम अंतर्गत दुर्गम भागातील नागरिकांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर हातपंप, शौचालय बांधून देऊन त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न सीआरपीएफच्या वतीने सुरू आहे.
पोलीस व सीआरपीएफ यांच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपक्रमांमुळे व नक्षलविरोधी अभियानामुळे देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीची आक्रमकता कमी झाली आहे. दुर्गम भागाचा विकास होण्यास सुरूवात झाली असल्याने नक्षल चळवळ आटोक्यात येऊ लागली आहे, अशी माहिती राजकुमार यांनी दिली. यावेळी सीआरपीएफचे डीआयजी दिनेश उनियल, १९२ बटालियनचे कमांडंट मनोजकुमार यांच्यासह सीआरपीएफचे इतर कमांडंट उपस्थित होते.(नगर प्रतिनिधी)