खनिजातून कोटींचा महसूल
By Admin | Updated: May 17, 2014 23:40 IST2014-05-17T23:40:44+5:302014-05-17T23:40:44+5:30
जिल्ह्यात असलेल्या गौण खनिजाच्या माध्यमातून खनिकर्म विभागाला २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये १४ कोटी ३४ लाख ६ हजार रूपयाचा महसूल प्राप्त झाला आहे.

खनिजातून कोटींचा महसूल
गडचिरोली : जिल्ह्यात असलेल्या गौण खनिजाच्या माध्यमातून खनिकर्म विभागाला २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये १४ कोटी ३४ लाख ६ हजार रूपयाचा महसूल प्राप्त झाला आहे. मागील वर्षीपेक्षा महसुलात २ कोटी १९ लाख २८ हजार रूपयाची घट झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात नद्यांची संख्या जास्त आहे. नदीमधून मिळणारी रेती इमारत बांधकामासाठी वापरली जाते. त्यामुळे रेतीला खनिजाएवढेच महत्व आहे. जिल्ह्यात एकूण १२० रेतीचे घाट आहेत. या घाटांचे लिलाव करून शासनाला महसूल प्राप्त होतो. २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये एकूण ५६ रेती घाटांचे लिलाव करण्यात आले आहेत. उर्वरित रेती घाटांचे लिलाव मात्र अजूनपर्यंत झालेले नाही. या लिलावातून खनिकर्म विभागाला ३ कोटी ६ लाख रूपयाचा महसूल प्राप्त झाला आहे. पर्यावरण विभागाने रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया अत्यंत कडक केली. त्यामुळे रेती घाटांचे सर्व्हेक्षण करण्याची प्रक्रिया जानेवारी महिन्यापर्यंत सुरू होती. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर जवळपास फेब्रुवारी महिन्यात लिलावाची प्रक्रिया राबविण्यात आली. रेतीचा उपसा करण्यासाठी कमी कालावधी मिळाल्याने बहुतांश कंत्राटदारांनी रेती घाटांच्या लिलावात रस दाखविला नाही. त्यामुळेच १२० घाटांपैकी केवळ ५६ घाटांचा लिलाव होऊ शकला. दगड, मुरूम, वीटा, गिट्टी यांचाही गौण खनिजामध्ये समावेश होतो. यांच्या उत्खननातून जवळपास १० कोटी रूपयाचा महसूल प्राप्त झाला आहे. रस्ता, पूल यांच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात दगड व मुरमाचा वापर केला जातो. जिल्ह्यात शेकडो मुरमाच्या खाणी आहेत. जिल्ह्यात वीटा बनविण्याचा व्यवसाय चांगला चालतो. प्रदुषणाच्या नावावर बरेच दिवस वीटा बनविण्यास परवानगी नाकारली होती. जवळपास मार्च महिन्यात वीटा बनविण्याला परवानगी दिली होती. त्यामुळे सुद्धा महसुलात घट झाली आहे. अवैधरितीने खनिज व गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करणार्यांकडून ५७ लाख ८१ हजार ९४ रूपयाचा दंडाच्या रूपाने महसूल गोळा केला आहे. मागील चार वर्षाच्या महसूल गोळा होण्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली असता, २०१३-१४ या आर्थिक वर्षाचा अपवाद वगळता, दरवर्षी खनिकर्म विभागाला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. २०१०-११ मध्ये ९ कोटीचे उद्दिष्ट दिले असतांना ९ कोटी ७५ लाख ३९ हजार रूपयाचा महसूल गोळा करण्यात आला. २०११-१२ मध्ये १४ कोटींचे उद्दिष्ट होते. त्यावर्षी १६ लाख ६१ हजाराचा महसूल गोळा झाला आहे. २०१२-१३ मध्ये १३ कोटीचे उद्दिष्ट असतांना १६ कोटी ५३ लाख ३४ हजार रूपयाचा महसूल गोळा झाला. तब्बल उद्दिष्टाच्या १२७.१८ टक्के महसूल गोळा झाला. २०१३-१४ या आर्थिक वर्षात १७ कोटीचे उद्दिष्ट दिले असतांना केवळ १४ कोटी ३४ लाख ६ हजार रूपये एवढाच महसूल गोळा झाला आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ८४.३५ एवढे आहे. चार वर्षाच्या कालावधीमध्ये २०१२-१३ मध्ये पहिल्यांदाच उद्दिष्टापेक्षा कमी महसूल गोळा झाला आहे. (नगर प्रतिनिधी)