अवघड व सर्वसाधारण क्षेत्रातील तफावत दुरूस्त करा!
By Admin | Updated: April 6, 2017 01:42 IST2017-04-06T01:42:43+5:302017-04-06T01:42:43+5:30
अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्राबाबतची सन २०१६-१७ मध्ये फारच तफावत निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

अवघड व सर्वसाधारण क्षेत्रातील तफावत दुरूस्त करा!
बीडीओंना निवेदन : प्राथमिक शिक्षक समितीची मागणी
एटापल्ली : अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्राबाबतची सन २०१६-१७ मध्ये फारच तफावत निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही तफावत दुरूस्त करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती एटापल्लीने संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती एटापल्ली यांच्याकडे केली आहे.
संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शिक्षक समितीने म्हटले आहे की, अवघड व सर्वसाधारण क्षेत्राबाबत सन २०१६-१७ मध्ये माहिती अद्यावत करण्यात आली आहे. ज्यात सर्वसाधारण गावे ही रस्त्यावर दर्शविण्यात आली आहे. परंतु संपूर्ण रस्त्यावरील गावे ही सर्वसाधारण क्षेत्रामध्ये दर्शविलेली नाही. तसेच रस्ता नसलेली गावे सुद्धा सर्वसाधारण क्षेत्रात दर्शविलेली आहे. यामध्ये विसंगती असून सदोष माहिती आहे. गट्टा केंद्रातील जि. प. शाळा गट्टा हे अवघड क्षेत्रात दाखविलेले आहेत. तर अडंगे, नेंडेर, सूरजागड ही तालुक्यापासून ३० किमी अंतरावर असून भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम भाग आहे.
गट्टा दळणवळण मार्गावर येते. ही गावे अवघड क्षेत्रात का नाही, ही गावे सर्वसाधारण क्षेत्रात कशी मोडतात, हा प्रश्न कायम आहे. अशीच बरीच गावे दळणवळणाची सोय नसलेली असून यामध्ये सरखेडा, कसुरवाही, लिंगोटोला, डुम्मे व एटापल्ली केेंद्रातील बरीच गावे त्याचप्रमाणे बुर्गी केंद्रातील उडेराटोला, आलदंडीटोला, गेदा केंद्रातील वारसेवाडा, दोडी, तांबडा, आलेंगाटोला, एकरा बुर्गी अशी गावे सर्वसाधारण क्षेत्रातून रद्द करून अवघड क्षेत्रात नोंदवून पुन्हा यादी अद्यावत करावी, संपूर्ण तालुका अवघड क्षेत्रात समाविष्ट करावा व १५-२० वर्षांपासून याच तालुक्यात काम करणाऱ्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात संधी द्यावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. याबाबत संवर्ग विकास अधिकाऱ्यांमार्फतच सीईओंना निवेदन दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)
एटापल्ली येथील शिक्षण विभागाने अवघड क्षेत्र व साधारण क्षेत्र निश्चिती करून यादी तयार केली असून सदर यादीतील सर्वसाधारण क्षेत्रात मोडणाऱ्या गावांच्या यादीत शासन निर्णयानुसार निश्चिती बरोबर केलेली नाही. शासन निर्णयानुसार तालुका मुख्यालयापासून दूर व डोंगराळ भागात असलेली गावे अवघड क्षेत्रात येत असून अशा गावांचा समावेश साधारण क्षेत्रात निश्चित केला आहे. तसेच नगर पंचायत एटापल्लीमध्ये येणारी गावे वगळता तालुक्यातील संपूर्ण गावे ही अवघड क्षेत्रामध्ये निश्चित करून तशी यादी करावी, अशी आमची प्रशासनाला विनंती आहे.
- विनोद करमरकर, तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य,
शिक्षक परिषद, एटापल्ली