कोरोना प्रवेशाने हिरावला बिनधास्तपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:01 IST2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:01:26+5:30

ग्रिन झोनमधून ऑरेंज झोनमध्ये प्रवेश करताना जिल्ह्यातील व्यवहारांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी मर्यादा आणल्या आहे. काही दिवसांपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणारे व्यवहार आता दुपारी २ पर्यंतच सुरू राहणार असून रविवारी बाजारपेठ पूर्णपणे बंद राहणार आहे.

Corona's entry deprived Hiravala of innocence | कोरोना प्रवेशाने हिरावला बिनधास्तपणा

कोरोना प्रवेशाने हिरावला बिनधास्तपणा

ठळक मुद्देजिल्हा ऑरेंज झोनमध्ये : आजपासून दुकाने २ वाजेपर्यंतच राहणार, सलून पुन्हा बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुंबईतून आलेल्या आणि प्रशासनाकडून संस्थात्मक क्वॉरंटाइन केलेले पाच जण कोरोनाबाधित असल्याचे रिपोर्ट आल्याने गडचिरोली जिल्हा आता कोरोनाबाधित जिल्ह्यांच्या यादीत पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुक्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यातील नागरिक कोरोनापासून दूर असल्याने बिनधास्त होते. पण आता कोरोनाच्या प्रवेशामुळे जिल्हावासियांच्या व्यवहारातील बिनधास्तपणा हिरावला आहे. ग्रिन झोनमधून ऑरेंज झोनमध्ये प्रवेश करताना जिल्ह्यातील व्यवहारांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी मर्यादा आणल्या आहे. काही दिवसांपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणारे व्यवहार आता दुपारी २ पर्यंतच सुरू राहणार असून रविवारी बाजारपेठ पूर्णपणे बंद राहणार आहे.
पहिल्यांदाच कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या कुरखेडा तालुक्यातील ४ आणि चामोर्शी तालुक्यातील १ अशा पाच जणांना जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आणि बाहेरून आलेल्या प्रवाशांनी आता अधिक काळजी घेणे गरजेचे असून प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.
जिल्ह्यात सापडलेले पाचही रूग्ण दहीसर, मुंबई येथून दि.१६ ला आले आहेत. त्यांना आल्यापासूनच संस्थात्मक कॉरंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे बाहेरच्या सामान्य लोकांशी त्यांचा संपर्क आला नसल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पण आता पूर्वीपेक्षा प्रशासनाकडून थोडे कडक नियम लावले जाणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले. सोमवारी जिल्हाधिकाºयांनी चामोर्शी व कुरखेडा तालुक्यातील विलगिकरण कक्षास भेटी देऊन पाहणी केली.

रेड झोनमधून येणाऱ्यांची माहिती द्या
मुंबई, पुणे, नागपूर शहरांसारख्या रेड झोनमधून आलेल्या नागरिकांची माहिती जिल्हा प्रशासनाला ०७१३२-२२२०३१ या क्र मांकावर कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंगला यांनी केले आहे. पोलीस विभाग, आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाला नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळेच जिल्हा ग्रीन झोन मध्ये ठेवण्यात यश आले होते. आता पुन्हा ग्रिन झोनमध्ये येण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

अंतर्गत बस प्रवास सुरू, आठवडी बाजार बंद
जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी काढलेल्या नवीन आदेशानुसार, जिल्ह्यातील अंतर्गत एसटी बसची प्रवासी वाहतूक, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी यासह किराणा दुकाने, औषधी विक्रीची दुकाने सुरू राहणार आहेत. पेट्रोल-डिझेलसाठी तहसीलदारांकडून परवाना घेण्याची आवश्यकता राहणार नाही.
नवीन आदेशानुसार सर्व शैक्षणिक संस्था बंद राहतील. याशिवाय सलून (केश कर्तनालय), खरेदी संकुले, निवासी हॉटेल्स, सर्व प्रकारचे कार्यक्रम, प्रार्थनास्थळे आधीप्रमाणे बंदच राहतील. याशिवाय आता केवळ दैनंदिन बाजार भरविण्यास परवानगी राहणार आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका- जिल्हाधिकारी
पहिल्यांदाच कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात आढळल्यामुळे सकाळपासून विविध अफवांना पेव फुटले होते. गडचिरोली शहराच्या रामनगर भागातही कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या अफवा सोशल मिडियावरून फिरत होत्या. पण जिल्ह्यातील कोरोनाबाबतची माहिती प्रशासन दैनंदिन स्वरूपात माध्यमांद्वारे प्रसिद्ध करत असते. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अशा अफवा पसरविणाºयांवर प्रशासनाकडून कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Corona's entry deprived Hiravala of innocence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.