वृक्ष लागवडीला यावर्षी कोरोनाचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST2020-06-10T05:00:00+5:302020-06-10T05:00:43+5:30
पर्यावरणाचे संतुलन राखण्यात झाडांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. मात्र वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, जलसिंचन प्रकल्प यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन राज्य शासनाने वृक्ष लागवड योजना सुरू केली होती. त्या योजनेच्या सनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी वन विभागावर सोपविण्यात आली होती.

वृक्ष लागवडीला यावर्षी कोरोनाचे ग्रहण
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. याचा फटका वृक्ष लागवड योजनेलाही बसला आहे. वृक्ष लागवडीसाठी गडचिरोली वनवृत्ताला निधी उपलब्ध करून न दिल्याने यावर्षी केवळ ७ लाख ४ हजार वृक्ष लागवड होणार आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी गडचिरोली वनवृत्तांतर्गत सुमारे ५८ लाख ३६ हजार वृक्ष लागवड केली होती.
पर्यावरणाचे संतुलन राखण्यात झाडांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. मात्र वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, जलसिंचन प्रकल्प यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन राज्य शासनाने वृक्ष लागवड योजना सुरू केली होती. त्या योजनेच्या सनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी वन विभागावर सोपविण्यात आली होती. वन विभागालाच सर्वाधिक उद्दिष्ट दिले जात होते.
मागील वर्षी वन विभागाने कृत्रिम वृक्ष लागवड योजनेंतर्गत २८ लाख ८८ हजार तर नैसर्गिक पुनरूत्पादनांतर्गत २९ लाख ४८ हजार असे एकूण ५८ लाख ३६६ हजार रोपांची लागवड केली होती. वृक्ष लागवडीसाठी शासनामार्फत वन विभागाला निधी उपलब्ध करून दिला जात होता. यावर्षीच्या पावसाळ्यात १५ लाख ५८ हजार वृक्ष लागवड केली जाईल. त्यासाठी २३ कोटी ९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र शासनाने केवळ ३ कोटी १२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. एवढ्या निधीतून १५ लाख वृक्षांची लागवड करणे कठीण असल्याने वन विभागाने वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही कमी करून ते ७ लाख ४ हजारावर आणले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वृक्ष लागवड अत्यंत कमी होणार आहे.
गडचिरोली, देसाईगंज, भामरागड विभागाला खो
शासनाकडून वृक्ष लागवडीसाठी पुरेसा निधी प्राप्त झाला नसल्याने गडचिरोली, देसाईगंज आणि भामरागड वन विभागाला यावर्षी वृक्ष लागवडीतून खो देण्यात आला आहे. केवळ आलापल्ली व सिरोंचा वन विभागात वृक्ष लागवड होणार आहे. काळाच्या ओघात काही वृक्ष नष्ट होतात. त्यांच्या जागेवर नवीन वृक्षांची लागवड करावी लागते. याबाबत वन विभाग पुढील १० वर्षांचे नियोजन करते. त्याला कार्यआयोजन असे संबोधले जाते. केवळ यासाठीच शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. यातून ३०३.२५ हेक्टर क्षेत्रावर ६.८२ लाख वृक्षांची लागवड होणार आहे. जिल्हा योजनेतून सिरोंचा वन विभागात २० हेक्टर क्षेत्रावर २२ हजार वृक्ष लागवड होणार आहे.