कोरोनामुळे ग्रामस्थांनी कारले विक्री केली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:00:52+5:30
परिसरातील शेतकरी मोहटोला किन्हाळा येथे ठोक स्वरूपात कारले विक्रीसाठी आणतात. व्यापाऱ्यांनी या गावामध्ये स्वत:चे वजनकाटे लावले आहेत. कारले खरेदी-विक्रीसाठी शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठी गर्दी उसळते. खरेदी-विक्री करताना शारीरिक अंतर पाळले जात नाही.

कोरोनामुळे ग्रामस्थांनी कारले विक्री केली बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहटोला/किन्हाळा : कारले खरेदी करण्यासाठी मोहटोला, किन्हाळा या गावांमध्ये व्यापाऱ्यांची मोठी गर्दी उसळत असल्याने कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका लक्षात घेऊन ग्रामस्थांनी कारले विक्रीचे वजनकाटे बंद पाडले आहेत. त्यामुळे कारले उत्पादक शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे.
मोहटोला, किन्हाळा, विहीरगाव, चिखली तूकुम, रिठ, डोंगरगाव (हलबी), फरी, झरी, उसेगाव, पिंपळगाव हलबी, पोटगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कारल्यांचे उत्पादन घेतले जाते. येथील कारले नागपूर, भंडारा, भिलाई, रायपूर व अन्य शहरांमध्ये पाठविले जातात. परिसरातील शेतकरी मोहटोला किन्हाळा येथे ठोक स्वरूपात कारले विक्रीसाठी आणतात. व्यापाऱ्यांनी या गावामध्ये स्वत:चे वजनकाटे लावले आहेत. कारले खरेदी-विक्रीसाठी शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठी गर्दी उसळते. खरेदी-विक्री करताना शारीरिक अंतर पाळले जात नाही.
नागपूर व इतर कोरोना प्रभावित शहरांमध्ये जाऊन वाहने परत येतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामस्थांनी मोहटोला किन्हाळा येथे कारले व इतर भाजीपाल्याची खरेदी-विक्री करू न देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे कारले उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
प्रामुख्याने उन्हाळ्यात कारल्याचे उत्पादन घेतले जाते. आत्तापर्यंत विकलेल्या कारल्यांमधून शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च निघाला. कारल्यांचे उत्पादन पावसाळ्यापर्यंत चालते. यानंतरच्या विक्रीतून नफा मिळणार होता. मात्र खरेदी-विक्रीवर बंदी आणल्याने नफ्यापासून शेतकºयांना वंचित राहावे लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
विक्रीचा प्रश्न गंभीर
या परिसरातील शेतकरी दर दिवशी शेकडो क्विंटल कारल्यांचे उत्पादन करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणातील कारले केवळ गडचिरोली जिल्ह्यात विकणे कठिण आहे. त्यामुळे कारले विक्रीचा प्रश्न गंभीर झाला आहे. शारीरिक अंतर ठेवून कारल्यांची विक्री केली जाईल. तसेच कोरोना संदर्भातील नियम पाळले जातील. मात्र कारले विक्री करू द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
निर्यात थांबल्याने भाजीपाला स्वस्त
गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील उत्पादित भाजीपाला व पालेभाज्याची निर्यात कोरोनाच्या संचारबंदीमुळे जिल्ह्याबाहेर तसेच मोठ्या शहरात गेल्या महिनाभरापासून होत नसल्याचे दिसून येते. परिणामी उत्पादक शेतकºयांना भाजीपाला जिल्ह्यातच विकावा लागत आहे. परिणामी शेतकºयांना योग्य भाव मिळत नसल्याचे दिसते.