१६२ ग्रामपंचायतीत २०० वर अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST2021-01-08T05:58:41+5:302021-01-08T05:58:41+5:30
चामोर्शी, अहेरी, मूलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या सहा तालुक्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यात २० जानेवारीला मतदान होणार आहे. या तालुक्यांमधील ...

१६२ ग्रामपंचायतीत २०० वर अविरोध
चामोर्शी, अहेरी, मूलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या सहा तालुक्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यात २० जानेवारीला मतदान होणार आहे. या तालुक्यांमधील १६२ ग्रामपंचायतध्ये उमेदवारांचा अभूतपूर्व उत्साह पहायला मिळाला. सहा तालुक्यांमध्ये ३ हजारांवर इच्छुकांचे अर्ज आले होते. विशेष म्हणजे बहुतांश अर्ज परिपूर्ण असल्यामुळे ते पात्र ठरले.
बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन मागे घेण्याची मुदत होती. त्यानंतर लगेच निवडणुकीच्या रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करायचे होते. रात्री उशिरापर्यंत ते काम सुरू होते. याशिवाय अविरोध निवडल्या जात असलेल्या उमेदवारांची यादी तयार करायचे कामही संबंधित तहसील कार्यालयांमध्ये सुरू होते. ग्रामीण व दुर्गम भागातील उमेदवार आणि त्यांचे समर्थक संबंधित तहसील कार्यालयाच्या प्रांगणात निवडणूक चिन्ह कोणते मिळते याची प्रतीक्षा करीत होते.
गुरुवारपासून उमेदवारांचा चिन्हासह प्रचार सुरु होईल. त्यांना प्रचारासाठी एक आठवडा मिळणार आहे. दुर्गम भागातील काही ग्रामपंचायतींमध्ये एकही नामांकन आले नाही. एटापल्ली तालुक्यात १० जागा रिक्त आहेत तर मानेवारा आणि वाघेझरी या दोन ग्रामपंचायती अविरोध आल्या आहेत. अहेरी तालुक्यात कोनबेड ही एक ग्रामपंचायत अविरोध आली आहे. सहा ग्रामपंचायतींपैकी चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक ६९ ग्रामपंचायतींमधील ६०३ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी एक हजाराच्या घरात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
(बॉक्स)
दुर्गम भागातही उत्साह कायम
यापूर्वीच्या अनुभवानुसार दुर्गम भागातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये उमेदवार नामांकन भरण्यासाठी पुढाकारच घेत नव्हते. नक्षल दहशतीसोबतच कागदपत्रांची कमतरता हे त्यामागील मुख्य कारण होते. पण यावेळी दोन्ही कारणे प्रभावहीन ठरल्यामुळे उमेदवारांचा उत्साह वाढला असून नामांकन दाखल करणाऱ्यांची संख्या बरीच वाढली आहे.