आदिवासी क्षेत्रात नद्यांवर बंधारे बांधा

By Admin | Updated: November 18, 2016 01:25 IST2016-11-18T01:25:31+5:302016-11-18T01:25:31+5:30

गडचिरोली जिल्ह्यात नद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या नद्यांवर बंधारे बांधल्यास शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल.

Constrain the rivers in tribal areas | आदिवासी क्षेत्रात नद्यांवर बंधारे बांधा

आदिवासी क्षेत्रात नद्यांवर बंधारे बांधा

नियम ३७७ वर चर्चा : अशोक नेते यांची लोकसभेत मागणी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या नद्यांवर बंधारे बांधल्यास शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे नागरिक विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊन नक्षलवादाची समस्या सुटण्यास फार मोठी मदत होईल. त्यामुळे नद्यांवर बंधारे बांधण्याची योजना हाती घ्यावी, अशी मागणी नियम ३७७ अंतर्गत खासदार अशोक नेते यांनी लोकसभेत केली आहे.
लोकसभेत निवेदन सादर करताना खासदार अशोक नेते म्हणाले की, शासनाने आदिवासी बहूल क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी वनजमिनीचे वाटप केले आहे. मात्र सिंचनाअभावी शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकला नाही. जोपर्यंत आदिवासी नागरिकांना वाटप करण्यात आलेल्या वनजमिनीच्या सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येत नाही. तोपर्यंत त्यांच्या जमिनी पडिक राहणार आहेत. त्यांची आर्थिक उन्नती होऊ शकणार नाही. आज देशात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नक्षल प्रभावित असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. नक्षलवादी वाढण्याचे मागासलेपण व अविकसीतपणा हे महत्त्वाचे कारण आहे. गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगेच्या अनेक उपनद्या आहेत. त्याचबरोबर मोठमोठे नाले सुध्दा आहेत. या उपनद्या व नाल्यांना आठ महिने पाणी राहते. या नद्यांवर बंधारे बांधल्यास शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. लहान बंधारे बांधण्यासाठी केंद्रीयस्तरावर एक कार्यक्रम हाती घेण्यात यावा, बंधारे बांधल्यास येथील शेतीला आठ महिने सिंचन सुविधा उपलब्ध होईल. नागरिकांचा विकास झाल्यास नागरिक आपोआप नक्षलवाद्यांना धूडकावून लावतील. त्यामुळे केंद्र शासनाने बंधारे बांधण्याची योजना तत्काळ अंमलात आणावी, अशी मागणी लोकसभेला सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. (प्रतिनिधी)

वनपट्ट्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करणे गरजेचे
गडचिरोली जिल्ह्यात हजारो नागरिकांना वनपट्टे वाटप करण्यात आले आहेत. मात्र हे वनपट्टे सिंचनाच्या सोयीअभावी पडिक असल्याची बाब संसदेच्या लक्षात आणून दिली. मोठे सिंचन प्रकल्प उभे करणे जंगलामुळे अशक्य असल्याने नद्या व नाल्यांवर लहान बंधारे बांधल्यास वनपट्ट्यांना सिंचन सुविधा उपलब्ध होईल, असाही मुद्दा खा. नेते यांनी उपस्थित केला.

Web Title: Constrain the rivers in tribal areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.