जलसंधारणाची दोन हजार कामे पूर्ण
By Admin | Updated: July 21, 2015 02:17 IST2015-07-21T02:17:34+5:302015-07-21T02:17:34+5:30
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध सहा विभागांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १

जलसंधारणाची दोन हजार कामे पूर्ण
गडचिरोली : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध सहा विभागांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १ हजार ९५८ जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली असून ४२७ कामे अपूर्ण आहेत. पावसाळा सुरू झाल्याने सध्या जलसंधारणाच्या कामाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे उर्वरित कामे पावसाळ्यानंतर केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.
पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी तसेच जलव्यवस्थापन संदर्भात राज्याला पूर्णपणे सक्षम करण्यासाठी राज्याच्या ग्राम विकास विभागाच्या वतीने यंदा २०१५-१६ या वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत हाती घेण्यात आले आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या आराखड्यात जिल्ह्यातील १५२ गावांची निवड करण्यात आली. या १५२ गावांमध्ये एकूण ४ हजार ११८ जलसंधारणाची कामे मंजूर करण्यात आली. यापैकी यंदा प्रशासनाच्या वतीने एकूण २ हजार ३८५ कामांना सुरूवात करण्यात आली. यापैकी सद्य:स्थितीत १ हजार ९५८ कामे पूर्ण झाले आहे. तर ४२७ कामे अपूर्ण आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी, वन, लघुसिंचाई, पंचायत समिती, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने जलसंधारणाची कामे घेण्यात आली. जलयुक्त शिवार अभियान २०१५ ते २०१९ पर्यंत सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात १५२ गावांमध्ये २ हजार ३८५ कामे सुरू करण्यात आली. यापैकी १ हजार ९५८ कामे पूर्ण करण्यात आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
कामांवर ३२ कोटींचा खर्च
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत १५२ गावातील एकूण ४ हजार ११८ कामांसाठी शासनाने १०८ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. विविध विभागाने या कामांवर लाखो रूपये खर्च केले असून आतापर्यंत सर्व विभाग मिळून जलसंधारणाच्या कामांवर ३२ कोटी रूपये खर्च झाले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.
३० जून होती अखेरची डेडलाईन
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या १५२ गावातील विविध विभागाच्या वतीने घेण्यात आलेली जलसंधारणाची कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करावयाची होती. जून महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत तसे निर्देश राज्याचे उपायुक्त हेमंतकुमार पवार यांनी दिले होते. मात्र अनेक कामे अपूर्ण आहेत.
कृषी विभाग आघाडीवर
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या मनरेगा विभागाने ३२१, वन विभागाने ४७५, जि.प. सिंचाई विभागाने १२८, लघू सिंचाई विभागाने १२ व चंद्रपूर लघू सिंचाई विभागाने केवळ एक काम पूर्ण केले आहे. कृषी विभागाने सर्वाधिक १ हजार १२१ कामे पूर्ण करून जलयुक्त शिवार अभियानात आघाडी घेतली आहे.
विभागनिहाय अपूर्ण कामे
कृषी विभाग २८
जिल्हा परिषद मनरेगा१३६
वन विभाग १५५
जि.प. सिंचन९१
लघुसिंचन १५
लघुसिंचन चंद्रपूर०२