जिल्ह्यातील चालू सिंचन प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST2021-02-05T08:49:57+5:302021-02-05T08:49:57+5:30
गुरुवारी (दि. २८) गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन क्षेत्राबाबत अहेरी येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला अहेरीचे आमदार धर्मरावबाबा ...

जिल्ह्यातील चालू सिंचन प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करा
गुरुवारी (दि. २८) गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन क्षेत्राबाबत अहेरी येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, आदिवासी विकास कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी राहुल गुप्ता, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे कार्यकारी संचालक आर.डी. मोहिते, चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील, गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश मेश्राम, तहसीलदार ओंकार ओतारी व पाटबंधारे विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती व गोदावरी या नदीतून मुबलक प्रमाणात पाणी वाहात जाते. या भागात पाणी अडवून किंवा उपसा करून सिंचन प्रकल्प उभारल्यास मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ करता येईल, असे पाटील म्हणाले.
(बॉक्स)
तर १.८३ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार
यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पूर्ण व चालू स्थितीतील ६१ सिंचन प्रकल्पांचा आढावा घेतला. जिल्ह्यात पूर्ण झालेले प्रकल्प एकूण ३० आहेत. यातून आता ३४ हजार ३१९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. यात दोन मोठे सिंचन प्रकल्प, एक बॅरेज, सात लघु, १५ मामा तलाव व पाच उपसा सिंचन प्रकल्प आहेत तसेच सध्या आठ प्रकल्प बांधकामाधीन आहेत. येत्या दोन वर्षात ते पूर्ण झाल्यास २५ हजार ७५७ हेक्टर सिंचन क्षेत्रात वाढ होईल. यामध्ये ५ उपसा सिंचन योजना, १ बॅरेज व २ लघु प्रकल्प आहेत. अशाप्रकारे पूर्ण झालेले व चालू तसेच अन्वेषणाधीन प्रकल्प मिळून ६१ सिंचन प्रकल्पातून जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार १२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे.