वीज पुरवठ्याच्या समस्येने ग्रस्त नागरिक झाले त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 06:00 AM2019-09-19T06:00:00+5:302019-09-19T06:00:30+5:30
वीज समस्येला घेऊन कोटगूल भागातील ४० वर नागरिकांनी कोटगूल येथील विद्युत विभागाच्या उपकेंद्र कार्यालयावर सोमवारी धडक दिली. दरम्यान उपअभियंता पवार यांना निवेदन देऊन सदर समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, कोटगूल भागातील वीज सेवा सुरळीत करण्यासाठी नवीन डीपी बसविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : कोरची तालुक्याच्या कोटगूल व धानोरा तालुक्याच्या मुरूमगाव भागात गेल्या काही महिन्यांपासून खंडित वीज पुरवठा तसेच वीज पुरवठ्याच्या लपंडावाची समस्या बिकट झाली आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यात यावी, अशी मागणी कोटगूल येथील नागरिकांनी केली आहे.
वीज समस्येला घेऊन कोटगूल भागातील ४० वर नागरिकांनी कोटगूल येथील विद्युत विभागाच्या उपकेंद्र कार्यालयावर सोमवारी धडक दिली. दरम्यान उपअभियंता पवार यांना निवेदन देऊन सदर समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, कोटगूल भागातील वीज सेवा सुरळीत करण्यासाठी नवीन डीपी बसविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी हजर राहत नसल्याने दुर्गम भागातील नागरिकांना योग्य सेवा मिळत नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून मुरूमगाव उपकेंद्रात उपअभियंत्याची नियुक्ती करण्यात आली नाही. यापूर्वी येथील उपअभियंता पुनेश्वर मेश्राम यांची बदली झाली तेव्हापासून या भागातील सेवा वाऱ्यावर आहे. या ठिकाणी नवीन अभियंता येण्यापूर्वी बदली झालेल्या अभियंता मेश्राम यांना भारमुक्त करण्यात आले. त्यामुळे मुरूमगाव येथे अभियंत्याचे पद रिक्त आहे. यासंदर्भात कोटगूल भागातील नागरिकांनी यापूर्वी चक्काजमा आंदोलन केले होते. लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदन दिले. मात्र आश्वासनाच्या पलिकडे कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या भागातील नागरिक प्रशासनाच्या कारभारावर नाराज आहेत.
मुरूमगाव उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांकडून वीज पुरवठा व दुरूस्तीचे काम योग्यरित्या केले जात नाही. कुलभट्टी, कटेझरी भागात लाईनमनची नियुक्ती करण्यात आली. मात्र सदर लाईनमनचे गेल्या चार महिन्यांपासून लोकांना दर्शन होत नसल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.
सावरगाव भागासाठी ठाकरे नामक लाईनमनची नियुक्ती करण्यात आली. मात्र सदर लाईनमन धानोरावरून सावरगाव येथे ये-जा करतात. मुख्यालयी राहत नाही. ग्यरापत्ती भागातही अशीच समस्या आहे. एकूणच कोटगूल भागातील वीज समस्येकडे वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
निवेदन देताना कोटगूलचे सरपंच राजेश नैताम, कोसमीचे सरपंच प्रेमसिंग हलामी, कोटगूलचे उपसरपंच झुलफीफार खेतानी, प्रमेशर लोहंबरे, चंद्रशेखर कुमरे, हेमंत कुमरे, नरेश शांडिल, शेखर हलामी, केवळराम टेंभूर्णे आदीसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
-तर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार
कोरची व धानोरा तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील खंडित वीज पुरवठ्याची तसेच लपंडावाची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यात यावी. अभियंत्याची पदे भरण्यात यावी. लाईनमनला मुख्यालयी ठेवण्यात यावे, आदी मागण्या निकाली काढाव्या, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार, असा इशारा कोटगूल भागातील सरपंच, उपसरपंचासह ५० नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाºयांनी तसेच लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन वीज पुरवठ्याची समस्या मार्गी काढावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.