योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा
By Admin | Updated: July 17, 2015 01:41 IST2015-07-17T01:41:57+5:302015-07-17T01:41:57+5:30
केंद्रातील भाजपा सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी जनधन योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओ, जीवन ज्योती विमा योजना, ...

योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा
खासदारांचे आवाहन : चामोर्शीत ‘वर्ष एक, सुरुवात अनेक’ कार्यक्रम
चामोर्शी : केंद्रातील भाजपा सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी जनधन योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओ, जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान जीवन विमा योजना, अटल पेंशन योजना व शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले.
केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार निर्देशालय व स्थानिक प्रशासन गडचिरोली यांच्या वतीने चामोर्शी येथे ‘वर्ष एक, सुरुवात अनेक’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक नगर पंचायतीच्या सभागृहात गुरूवारी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चामोर्शी पंचायत समितीच्या सभापती शशी चिळंगे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी नि. म. तळपाडे, देवेंद्र दहिकर, फरेंद्र कुत्तीरकर, अरूणकुमार, सिंधू बारसागडे, तहसीलदार यू. जी. वैद्य, सुनील चडगुलवार, एस. पी. गोशिकवार, डी. पी. भोगे, पंचायत समिती सदस्य दिलीप चलाख, रमेश दुर्गे आदी उपस्थित होते. प्रश्नमंजुषा प्रतियोगीताही घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल तिडके, संचालन भालचंद्र रामटेके तर आभार रामचंद्र सोनसल यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)