नागरिक बसपासून वंचित
By Admin | Updated: May 13, 2017 02:09 IST2017-05-13T02:09:17+5:302017-05-13T02:09:17+5:30
तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामगड परिसरात बससेवेचा अभाव आहे.

नागरिक बसपासून वंचित
प्रशासनाचे दुर्लक्ष : धानोरा- बेतकाठी मार्गे मालेवाडा- रामगड बससेवा सुरू करा
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामगड परिसरात बससेवेचा अभाव आहे. त्यामुळे या भागातील नागरिक खासगी वाहनाने प्रवास करून गाव गाठतात. या भागात राज्य परिवहन महामंडळाने धानोरा ते बेतकाठी व्हाया मालेवाडा- रामगड या मार्गे बससेवा सुरू करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
कुरखेडा तालुक्यातील रामगड परिसर दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जातो. या भागातून अनेक नागरिक नेहमीच तालुका व जिल्हा मुख्यालयात ये- जा करीत असतात. शिवाय धानोरा- बेतकाठी व्हाया मालेवाडा- रामगड हा मार्ग छत्तीसगड सीमेलगत गावांशी संबंधित आहे. कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा ते रामगड दरम्यान अनेक महत्त्वाची खेडी आहेत. परंतु या खेड्यांमध्ये अद्यापही बससेवा पोहोचली नाही. या मार्गाचे डांबरीकरण झाले असतानाही येथे बससेवा सुरू करण्यात आली नाही. गडचिरोली ते बेतकाठी या मार्गावर धानोरा, येरकड, सुरसुंडी, मुरमाडी, देवसरा, जयसिंग टोला, मालेवाडा, धनेगाव, रानवाही, भगवानपूर, पिपरी, वारवी, दादापूर, रामगड, पुराडा, बेळगाव, कोरची, बुटेकसा, बेतकाठी आदी गावांचा समावेश आहे. या मार्गावर बससेवा सुरू झाल्यास नागरिकांकरिता सोयीचे होऊ शकते. तसेच जिल्हा मुख्यालयात व छत्तीसगड येथे जाण्याकरिता कमी अंतर होईल. स्वातंत्र्याची ७० वर्षे उलटूनही या मार्गावर बससेवा सुरू झाली नाही. प्रशासन व एसटी महामंडळाने लक्ष देऊन या मार्गाचे सर्वेक्षण करून बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
सर्वेक्षण करून सेवा उपलब्ध करा -तुलावी
कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा ते रामगड दरम्यान अनेक महत्त्वाची खेडी आहेत. मात्र या गावांसाठी अद्यापही बस सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली नाही. या मार्गाचे डांबरीकरण झाले असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मार्गाचे तत्काळ सर्वेक्षण करून बससेवा सुरू करावी, अशी मागणी जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी यांनी केली आहे. या परिसरातील बहुसंख्य नागरिक सदर मार्गाने ये- जा करतात. त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन बससेवा सुरू करावी, अशी मागणी जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी यांनी केली आहे.