चामोर्शीतील तांदूळ पोहोचला मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 13:54 IST2019-05-15T13:52:00+5:302019-05-15T13:54:21+5:30
जिल्ह्यात धान लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र असलेल्या चामोर्शी तालुक्यातील शेतकरी उच्च प्रतीच्या बारिक तांदळाच्या धानाचे उत्पादन घेत आहेत.

चामोर्शीतील तांदूळ पोहोचला मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात
लोमेश बुरांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात धान लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र असलेल्या चामोर्शी तालुक्यातील शेतकरी उच्च प्रतीच्या बारिक तांदळाच्या धानाचे उत्पादन घेत आहेत. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धानाची चामोर्शी शहरात भरडाई केली जाते. त्यानंतर मागणीनुसार राईस मिल मालक मोठ्या शहरांसह परराज्यात चामोर्शीतील बारिक तांदळाचा पुरवठा करीत आहेत. यंदाही शेकडो क्विंटल बारिक तांदूळ मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात पोहोचला आहे.
चामोर्शी तालुका मुख्यालयी एकूण १६ राईस मिल आहेत. जिल्ह्यात देसाईगंज तालुक्यानंतर सर्वाधिक राईस मिल चामोर्शी तालुक्यात आहेत. शेतकरी खरीप हंगामात विविध जातीच्या बारिक धानाची लागवड करतात. मुख्यत्त्वे उच्च प्रतीच्या बारिक तांदळाला मोठ्या शहरांसह परराज्यात मागणी असल्याने गेल्या तीन ते चार वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी बारिक धानाच्या उत्पादनाकडे वळले आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामात एकरी सरासरी २० ते २५ पोती इतके धानाचे उत्पादन झाले आहे. या भागातील नागरिकांचा आर्थिक लेखाजोखा व उदरनिर्वाह धान उत्पादनावरच चालतो. धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने चामोर्शीत तांदळाची बाजारपेठही उपलब्ध झाली आहे.
येथील राईस मिलमध्ये अत्याधुनिक तंत्राचा वापर करून तांदळावर प्रक्रिया होऊ लागली. पाहतापाहता चामोर्शी तालुक्यातील तांदळाला मध्यप्रदेशासह छत्तीसगड राज्यात मागणी वाढली. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील बीड, लातूर, वाशिम तसेच मुंबई, पुणे या मोठ्या शहरांतही चामोर्शीच्या तांदळाला बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
शहरातील अनेक मोठ्या राईस मिलमध्ये बारिक धानाच्या तांदळाची पोती तयार करून ती विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. राईस मिलमधून निघणाºया धानाच्या कोंड्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. येथील कोंडा विटाभट्टी, पॉवर प्लान्ट व इतर कंपन्यांना पुरविला जात आहे.
अशी होते तांदूळ निर्मिती प्रक्रिया
राईस मिलमध्ये भरडाईसाठी तांदूळ आणल्यानंतर डिशमधून खडे, कचरा आदींची साफसफाई केली जाते. त्यानंतर रबर रोलरमध्ये धान भरडाईसाठी टाकला जातो. त्यानंतर यंत्रातून तांदूळ व कुकूस वेगवेगळे केले जातात. ग्रेडर मशीनमधून बारिक व ठोकळ तांदूळ वेगवेगळा केला जातो. त्यानंतर तांदळाला तीन वेळा पॉलिशची प्रक्रिया करून दोन वेळा सिल्की व पुन्हा ग्रेडिंग केल्यानंतर सॉरिटेजमधून बाहेर आलेला तांदूळ पोत्यात भरला जातो. अशा प्रकारे तांदूळ निर्मिती प्रक्रिया पूर्ण केली जाते.