बदली झाले १२; मिळाले दोनच
By Admin | Updated: August 26, 2015 01:21 IST2015-08-26T01:21:05+5:302015-08-26T01:21:05+5:30
स्थानिक पंचायत समितीच्या कार्यालयातून १२ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली.

बदली झाले १२; मिळाले दोनच
कामे खोळंबली : अहेरी पंचायत समिती कर्मचाऱ्यांअभावी ओस
अहेरी : स्थानिक पंचायत समितीच्या कार्यालयातून १२ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. मात्र त्याबदल्यात पंचायत समितीला केवळ दोनच नवीन कर्मचारी मिळाल्याने पंचायत समितीेचे कार्यालय कर्मचाऱ्यांअभावी ओस पडले असल्याचे दिसून येते.
जिल्हा परिषद व ग्राम पंचायत यांच्यातील दुवा म्हणून पंचायत समितीची ओळख आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या जातात. ग्राम पंचायतीच्या कारभारवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा म्हणून पंचायत समितीची ओळख आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाची नाळ पंचायत समितीसोबत जोडली असल्याने दर दिवशी हजारो नागरिक पंचायत समितीत विविध कामांसाठी येतात. त्यामुळे पंचायत समितीत नेहमीच गर्दी राहते.
अहेरी पंचायत समितीतून विस्तार अधिकारी एम. के. काळबांधे, अभियंता एम. एन. ठाकुर, आस्थापना विभागातील एस. पी. शेंडे, सी. एस. नैताम, शिक्षण विभागातील आर. जी. भांडारवार, टी. व्ही. फटिंग, एम. ए. मानकर, कृषी विभागातील पी. पी. पदा, लेखा विभागातील डी. व्ही. देशमुख, के. एस. रंगुवार अशा एकूण १२ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. त्यामुळे तेवढेच कर्मचारी मिळणे अपेक्षित होते. मात्र बदलीचा दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही सी. एस. नैताम व डी. व्ही. देशमुख हे केवळ दोन कर्मचारी रूजू झाले आहेत. पंचायत समितीचे कर्मचारी एम. के. वाळके यांना पदोन्नती देऊन येथेच ठेवण्यात आले आहे. सुमारे १० कर्मचारी पंचायत समितीमधून निघून गेल्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कार्यालयातील टेबल व खुर्च्या रिकाम्या असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील नागरिक विविध कामांसाठी पंचायत समितीत येतात. मात्र कर्मचाऱ्यांअभावी काम होण्यास उशीर होत आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी या गंभीर बाबीकडे लक्ष घालून पंचायत समितीतील पदे भरण्यासंदर्भात जिल्हा परिषदेकडे मागणी लावून धरावी, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)