विकासातून जिल्ह्याची ओळख बदलवूया!

By Admin | Updated: August 27, 2015 01:33 IST2015-08-27T01:33:51+5:302015-08-27T01:33:51+5:30

जिल्हा निर्मितीच्या ३३ वर्षानंतरही तत्कालीन राज्यकर्त्यांच्या सदोष नियोजनामुळे जिल्हा विकासापासून कोसोदूर राहिला.

Change the identity of the district through development! | विकासातून जिल्ह्याची ओळख बदलवूया!

विकासातून जिल्ह्याची ओळख बदलवूया!

मान्यवरांचा सूर : ‘मेक इन गडचिरोली’वर चर्चासत्र
गडचिरोली : जिल्हा निर्मितीच्या ३३ वर्षानंतरही तत्कालीन राज्यकर्त्यांच्या सदोष नियोजनामुळे जिल्हा विकासापासून कोसोदूर राहिला. विकासाचे खरे गमक रोजगार निर्मितीत आहे. येत्या काळात जिल्ह्यात उद्योग व रोजगार निर्मितीच्या माध्यमातून गडचिरोली या मागास जिल्ह्याची सबंध महाराष्ट्रात ओळख बदलवूया, असा सूर ‘मेक इन गडचिरोली’ या चर्चासत्रात उपस्थित मान्यवरांनी काढला.
भाजपा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा वर्धापन दिनाचे औचित्य साधून बुधवारी आरमोरी मार्गावरील सुप्रभात मंगल कार्यालयात ‘मेक इन गडचिरोली’ या विषयावर मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, देसाईगंजचे नगरसेवक मोतीलाल कुकरेजा, प्रमोद पिपरे, प्रकाश गेडाम, सुधाकर येनगंधलवार, अनिल करपे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून शेतकरी नेते प्रकाश पोहरे, गडचिरोलीच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी अनबत्तुला, विद्यापीठाच्या बीसीयूडीचे संचालक डॉ. रोकडे, अ‍ॅड. प्रमोद बोरावार, माविमचे विभागीय व्यवस्थापक केशव पवार, प्राचार्य डॉ. प्रवीण पोटदुखे, अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक सुनील पाटील, जितेंद्र चौधरी, कांता मिश्रा, हितेंद्र पाटील, डॉ. ठावरी, अनिरूद्ध कदम, तुषार मेश्राम, सुभाष राजपूत, केदार, माही गु्रपचे व्यवस्थापक तुषार रावल आदी उपस्थित होते. आयोजक म्हणून आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे उपस्थित होते.
यावेळी तुषार रावल यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने संधी उपलब्ध करून दिल्यास माही ग्रुप गडचिरोली जिल्ह्यातील मोहफुलाच्या रसाची जगभरात मार्केटिंग करणार, असे सांगितले. सुभाष राजपूत म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे २५ हजार युवकांना रोजगाराची आवश्यकता आहे. दहावी, बारावी व पदवी उत्तीर्ण बेरोजगार उमेदवार जिल्ह्यात कोणताही स्वयंरोजगार करू शकतात. पे पार्इंट इंडियाच्या माध्यमातून आपण जिल्ह्यातील १० हजार बेरोजगारांना ५ हजार पासून तर ७५ हजार रूपये मासिक मिळकतीचा रोजगार देऊ शकतो, असे राजपूत यावेळी म्हणाले.
अरविंद पोरेड्डीवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशाच्या विकासाची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी पक्षाच्या पलीकडे जाऊन कार्य करण्याची गरज आहे.
याप्रसंगी नागपुरचे डॉ. भिसे, तुषार रावल, डॉ. रोकडे, अ‍ॅड. प्रमोद बोरावार, केशव पवार, सुनील पाटील, जितेंद्र चौधरी, जितेंद्र पाटील, तुषार मेश्राम आदी वक्त्यांनी जिल्हा विकासाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. डॉ. देवराव होळी, संचालन निकिता पारपेलीवार, अंजली दोडके यांनी केले. तर आभार आ. क्रिष्णा गजबे यांनी मानले. कार्यक्रमाला बाबुराव कोहळे, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, रवींद्र ओल्लालवार, डॉ. भारत खटी, डॉ. प्रकाश अर्जुनवार, प्रशांत वाघरे, रमेश भुरसे, अनिल पोहणकर, गोवर्धन चव्हाण, नंदू नरोटे आदींसह भाजपाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.यावेळी विविध वस्तूंची प्रदर्शनी लावण्यात आली होती. (स्थानिक प्रतिनिधी)
पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले, तत्कालीन राज्यकर्त्यांनी गंभीरपणे विकासाचे काम केले नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा विकास रखडला. भाषणापेक्षा कृती महत्त्वाची आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी भाजप व लोकप्रतिनिधींनी ‘मेक इन गडचिरोली’ची संकल्पना पुढे आणली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपली मानसिकता बदलवून कृती करण्याची गरज आहे. जिल्ह्याचे औद्योगिक धोरण बदलविणे आवश्यक असून उद्योग निर्मितीसाठी सुरक्षितता प्रदान करणे गरजेचे आहे. उद्योग निर्मितीसाठी आपले प्रयत्न सुरू असून येत्या चार वर्षांच्या काळात जिल्ह्यातील १५ ते २० हजार बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार देणार असल्याचे अभिवचनही ना. आत्राम यांनी यावेळी दिले.

खा. अशोक नेते म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वन व खनिज संपत्ती आहे. या संपत्तीवर प्रक्रिया करणारे छोटेमोठे उद्योग सुरू झाल्यास रोजगार निर्मिती होऊ शकते, त्यासाठीच आम्ही कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती व रोजगार निर्मितीतून जिल्ह्याचा विकास ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम येत्या दोन महिन्यात सुरू होणार असून राष्ट्रीय महामार्गाचे काम झाल्यावर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात भर पडणार आहे. यासाठी आपण केंद्र शासनाकडून आवश्यक तेवढा निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही खा. नेते यावेळी म्हणाले.

Web Title: Change the identity of the district through development!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.