एकलपूरचा चिक्कू नागपुरात
By Admin | Updated: June 8, 2014 23:54 IST2014-06-08T23:54:04+5:302014-06-08T23:54:04+5:30
देसाईगंज तालुक्यातील एकलपूर हे छोटेसे गाव भाजीपाला व फळांच्या उत्पादनाने नावारूपास आले असून येथील चिक्कूने थेट नागपूरची बाजारपेठ काबीज केली आहे. जिल्ह्यातील कृषी विभागाच्या

एकलपूरचा चिक्कू नागपुरात
२५ वर्षापूर्वीच्या मेहनतीचे फळ : कृषी विभागाचे मात्र दुर्लक्ष
कोरेगाव/चोप : देसाईगंज तालुक्यातील एकलपूर हे छोटेसे गाव भाजीपाला व फळांच्या उत्पादनाने नावारूपास आले असून येथील चिक्कूने थेट नागपूरची बाजारपेठ काबीज केली आहे. जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकार्यांचे मार्गदर्शन मिळाले असते तर उत्पादनात आणखी वाढ झाली असती, अशी अपेक्षा येथील शेतकरी वर्ग करीत आहेत.
धानाच्या पिकाचा उत्पादन खर्च परवडत नसल्याचे कारण शेतकरीवर्ग सांगत असला तरी बहुतांश शेतकरी अजूनही पारंपरिकरितीने धानाचेच उत्पादन घेत आहेत. मात्र एकलपूर येथील प्रयोगशील शेतकरी महादेव मुकुंदा सयाम व शंकर मुकुंदा सयाम यांनी धानाच्या शेतीला मुठमाती देत दोन एकर शेतात चिक्कू व फणसाच्या झाडांची २0 वर्षापूर्वी लागवड केली. चिक्कू व फणसाचे झाड लावण्यासाठी तत्कालीन कृषी अधिकारी भांदककर व एन. टी. पारखी यांनी महादेव सयाम व शंकर सयाम यांना मार्गदर्शन केले. दोघांनीही फणव व चिक्कुच्या झाडांची योग्यपद्धतीने लागवड करून त्यांची निगा राखली. काही वर्षानंतर झाडांना फळे यायला सुरूवात झाली. एका झाडापासून ५ ते ७ क्विंटल चिक्कूचे उत्पादन होते. तर एका फणसाच्या झाडापासून सुमारे २0 ते ३0 हजार रूपयाचे उत्पन्न मिळते. सयाम यांच्या शेतातील चिक्कू मोसंबी एवढे असल्याने ग्राहक सहज आकर्षीत होतो. त्याचबरोबर सदर चिक्कू अत्यंत गोड आहेत. त्यामुळे नागपूरचे व्यापारी स्वत: एकलपूर येथे येऊन खरेदी करतात. एकलपूर हे गाव भाजीपाला उत्पादनासाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. या गावातून दर दिवशी ५0 क्विंटलपेक्षा जास्त भाजीपाल्याचे उत्पादन होते. भाजीपाला हे पीक विशेषकरून हिवाळ्यात व उन्हाळ्यात घेतले जाते. याच शेतात पावसाळ्यादरम्यान धान पिकाचेही उत्पादन घेतले जाते. त्यामुळे येथील नागरिकांना शेतीच्या माध्यमातून वर्षभर रोजगार प्राप्त होतो. त्यामुळे एकलपूर हे गाव देसाईगंज तालुक्यातील एक सधन गाव म्हणून ओळख आहे. या गावाचा आदर्शन इतरही गावांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)