काहार समाजाचा शतकोत्तर उत्सव
By Admin | Updated: August 22, 2016 02:22 IST2016-08-22T02:22:40+5:302016-08-22T02:22:40+5:30
खवळलेल्या समुद्राला शांत करण्यास कोकणात कोळी समाजबांधव उत्साहात नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करतात.

काहार समाजाचा शतकोत्तर उत्सव
राखी पौर्णिमा : कुल दैवतांचे पूजन करून वैैरागडात काढली मिरवणूक
वैरागड : खवळलेल्या समुद्राला शांत करण्यास कोकणात कोळी समाजबांधव उत्साहात नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करतात. त्यानंतर या सणापासून मच्छिमारीला सुरूवात होते. त्याचप्रमाणे विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड गावातील काहार समाजबांधव राखी पौर्णिमेचा उत्सव साजरा करतात. या उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा लाभली असून यंदा काहार समाजबांधवांनी राखी पौर्णिमेचा शतकोत्तर उत्सव साजरा केला.
काहार समाजाचा मुख्य व्यवसाय म्हणजे, तलाव, बोड्यांत शिंगाड्याचे उत्पादन घेणे. समाजाचे कुलदैैवत एकलव्य (भुजल्या) राखी सणाच्या आठ दिवसांपूर्वी भुजल्या तयार करण्याचे काम महिला करतात. त्यानंतर विधीवत विसर्जन केले जाते. आपले कुलदैैवत एकलव्य यांच्या स्मरणार्थ मागील १०० वर्षांपासून हा उत्सव साजरा करण्याची परंपरा वैरागड येथे आहे.
सुरूवातीला या समाजातील ज्येष्ठ मंडळी टिकाराम अहीरकर, भगवान भरद्वार, कोलू बन्सोड यांनी परंपरा सुरू केली. आता या उत्सवात समाजातील श्रीराम अहीरकर, जयलाल बर्वे, भरद्वार, राजू भरद्वार, भैय्यालाल पंडेलगोत, जगदीश पंडेलगोत व समाजबांधव सहभागी होत आहेत. मोठ्या उत्साहात यंदा शतकोत्तर उत्सव साजरा करण्यात आला. गावातील मुख्य रस्त्याने महिलांची गौरींसह वाजत-गाजत मिरवणूक काढून नदीवर विधीवत पूजा केली व गौरींचे विसर्जन केले. (वार्ताहर)