सायटोला मार्गावरील सती नदीवर पूल बांधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST2021-01-17T04:31:37+5:302021-01-17T04:31:37+5:30
अपंग विवाह अनुदान योजनेची जागृती करा आष्टी : संपूर्ण महाराष्ट्र शासनाच्या वतीने अपंग युवक, युवतींसाठी कल्याण विवाह अनुदान योजना ...

सायटोला मार्गावरील सती नदीवर पूल बांधा
अपंग विवाह अनुदान योजनेची जागृती करा
आष्टी : संपूर्ण महाराष्ट्र शासनाच्या वतीने अपंग युवक, युवतींसाठी कल्याण विवाह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अपंग कल्याण विवाह योजना राबविली जाते. मात्र या योजनेची जनजागृती करण्यात येत नसल्याने अनेक अपंग युवक, युवती योजनेबाबत अनभिज्ञ आहेत.
गॅस सिलिंडरधारकांना केरोसिनचा पुरवठा करा
आरमोरी : शासनाने बीपीएलधारकांना गॅस सिलिंडरचे वितरण केले आहे. मात्र या बीपीएलधारकांना मिळणारे रॉकेल बंद केल्याने ग्रामीण भागात नागरिकांना फटका बसत आहे. ग्रामीण भागात रॉकेलची गरज सर्वाधिक असते. मात्र शासनाने गॅस देऊन रॉकेल बंद केल्याने गॅस सिलिंडर बीपीएलधारकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे पूर्ववत रॉकेलचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
इंजेवारी मार्गाची दुरवस्था कायमच
आरमोरी : तालुक्यातील सिर्सी ते इंजेवारी या मार्गावर जागोजागी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाने रहदारी करताना नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या मार्गाने बससेवा उपलब्ध आहे.
पुनर्वसित गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष
देसाईगंज : गाढवी नदीच्या काठावर वसलेल्या किन्हाळा व अरततोंडी या दोन्ही गावांना पुराचा फटका बसत होता. या गावांचे १९९४ रोजी पुनर्वसन करण्यात आले. किन्हाळा गाव पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसित झाले आहे. मात्र अरततोंडी गाव अर्धेअधिक जुन्याच ठिकाणी आहे. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास अडचण निर्माण होत असल्याने ही दोन्ही गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
मानापूर येथे बायपास मार्ग तयार करा
मानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्याच्या मानापूर गावातून पिसेवडधाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला नागरिकांनी अतिक्रमण करून अर्धा रस्ता गिळंकृत केला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आता सिमेंट काँक्रीटची पक्की घरे तयार झाली आहेत. शिवाय संरक्षक भिंतीचे बांधकाम झाल्यामुळे रस्ता अरुंद झाला. त्यामुळे दोन वाहने एकाच वेळी जाऊ करू शकत नाहीत. सदर समस्या मार्गी लावण्यासाठी मानापूर येथे बायपास मार्ग निर्माण करण्यात यावा, अशी मागणी आहे.
वन जमिनीवर अतिक्रमण; जंगल धोक्यात
आलापल्ली : जिल्ह्याच्या पाचही वन विभागात अनेक नागरिकांनी वन जमिनीवर मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. गरज नसतानाही लोक अतिक्रमण करीत आहेत. परिणामी जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होण्याचा धोका आहे.
शासकीय निवासस्थानी राहणे सक्तीचे करा
जोगीसाखरा : शासनाने लाखो रूपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाऱ्यांना देखभाली अभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत.
मुलचेरा शहरात पाळीव डुकरांचा हैदोस
मुलचेरा : तालुका मुख्यालयी पाळीव डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
कव्हरेज नसल्याने नागरिक त्रस्त
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात क व्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावातील नागरिकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नाही.
भामरागड तालुक्यातील गावे लाईनमनअभावी
भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एका लाईनमकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे त्यांना प्रत्येक गावी सारखाच वेळ देऊ शकत नाही.