ब्रिटिशकालीन देसाईगंज विकासाच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: November 29, 2014 01:22 IST2014-11-29T01:22:31+5:302014-11-29T01:22:31+5:30
ब्रिटिशकालीन जुने शहर अशी ओळख असलेल्या देसाईगंज शहरात अनेक समस्या आजही कायम आहे.

ब्रिटिशकालीन देसाईगंज विकासाच्या प्रतीक्षेत
देसाईगंज : ब्रिटिशकालीन जुने शहर अशी ओळख असलेल्या देसाईगंज शहरात अनेक समस्या आजही कायम आहे. या शहराचा विस्तार दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असतानाही शहराच्या मूलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजवर ज्या लोकप्रतिनिधींनी या भागाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांची भूमिका विकासाबाबत उदासीन राहिली आहे. सर्वसामान्यांच्या नजरेत भरणारा एकही मोठा प्रकल्प, मोठी योजना, लघू उद्योग तालुक्यात सुरू झालेला नाही़ तालुका निर्मितीच्या २० वर्षानंतरही बसस्थानकाची प्रतीक्षा, एमआयडीसी, स्वतंत्र कृषी बाजार समिती, पशु प्रक्षेत्रास नवसंजीवनी, सीआरपीएफ बटालियनच्या जागेचा प्रश्न जैसे थे आहे़
शहरात बसस्थानकाची नितांत गरज आहे़ ४० वर्षांपूर्वीच्या शेडवजा स्थानकावर प्रवाशांना प्रतीक्षेत राहावे लागते. जेव्हा जेव्हा शहराच्या विकासाचा मुद्दा निघतो सर्व प्रथम बसस्थानकाचा मुद्दा ऐरणीचा ठरतो़ मात्र सत्ताधाऱ्यांनी बसस्थानकाच्या मागणीला कधीच गंभीरपणे घेतलेले नाही़ परिवहन राज्यमंत्री जिल्ह्यातील होऊन गेले, या महामंडळाचे अध्यक्ष देसाईगंज शहरातून झालेले आहेत़ मात्र इतकी संधी असतांना देखील देसाईगंज शहरात अजूनही साधे बसस्थानक तयार झालेले नाही़ उद्योगविरहित जिल्ह्यातील उद्योगी शहर म्हणून नावलौकिक असलेल्या देसाईगंज शहरात एमआयडीसी करीता जागाच शिल्लक नाही़ उद्योगांना चालना देण्यासाठी आज स्वयंरोजगाराचे धडे शाळेतून विद्यार्थ्यांना दिले जात आहेत़ मात्र उद्योग सुरू करण्यासाठी होतकरू तरूणांना तालुक्यात जागा उपलब्ध नाही़ त्यामुळे एमआयडीसीची गरज तालुक्याला भासत आहे़ देसाईंगंज तालुक्यात कुरखेडा मार्गावर १४०० एकर जागेत पशु प्रजनन प्रक्षेत्र वसलेले आहे़ २० वर्षापूर्वी या कार्यालयात सह आयुक्ताचे पद होते़ मात्र हल्ली वर्ग दोनच्या पदावरून हे प्रक्षेत्र चालविले जात आहे़ येथील सीआरपीएफची बटालियन मुक्कामी स्वरूपात जिल्ह्यात वास्तव्यास राहावी यासाठी पशु प्रजनन प्रक्षेत्राच्या जागेपैकी हजार एकराची जागा बटालियनकरिता आरक्षित करण्यात आली होती़ त्याच दरम्यान लगतच्या गोंदिया जिल्ह्यातील केशोरी गावात एसआरपीएफ जवानांच्या गोळीबारात काही गावकऱ्यांना प्राणास मुकावे लागले होते़ अशी परिस्थिती बटालियन झाल्यावर विसोरा गावात देखील येऊ शकते. या मुद्यावरून गावकऱ्यांनी बटालियनच्या निर्मितीला विरोध दाखविला, तेव्हा पासून या राखीव जागे बाबत काय झाले ही माहिती गुलदस्त्यातच आहे़
शहराला भूषणावह असणाऱ्या संकरीत पशु प्रजनन व दुग्ध प्रक्षेत्रा कडे पंजाबराव कृषी विद्यापिठाचे दुर्लक्ष व प्रशासनाच्या नाकर्तेपणाने अंतिम घटका मोजत आहे. (वार्ताहर)