भाजप प्रचार साहित्य कॅनलमध्ये फेकले
By Admin | Updated: February 13, 2015 01:41 IST2015-02-13T01:41:09+5:302015-02-13T01:41:09+5:30
लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी पक्षस्तरावरून पाठविण्यात आलेले एक ट्रकच्या वर साहित्य देसाईगंज तालुक्यातील ...

भाजप प्रचार साहित्य कॅनलमध्ये फेकले
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी पक्षस्तरावरून पाठविण्यात आलेले एक ट्रकच्या वर साहित्य देसाईगंज तालुक्यातील एकलपूर गावाजवळील कॅनलमध्ये आढळून आल्याने पक्षीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेची भाजपच्या वर्तुळात गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत चर्चा असल्याने पक्षस्तरावर हे प्रकरण गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून अतिशय नियोजनबद्द प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. प्रत्येक उमेदवाराकडे रसद व प्रचार साहित्य पोहोचविण्यात आले. मात्र गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवार अशोक नेते यांच्याकडे प्रचार काळात बऱ्याच उशिरापर्यंत साहित्य आले नव्हते. अहेरी विधानसभा क्षेत्रात साहित्यही पाठविण्यासाठी त्यांनी स्थानिक स्तरावरून साहित्य तयार करून घेतले होते. पक्षाच्या राज्य शाखेकडून सदर साहित्य लोकसभा क्षेत्र प्रचार प्रमुखाकडे पाठविण्यात आले होते. मात्र त्यांनी हे साहित्य उमेदवाराकडे न पाठविता ते आपल्याजवळच ठेवून घेतले, अशी माहिती आता पुढे आली आहे. लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर वातावरण निवळल्यावर १५ दिवसांपूर्वी हे प्रचार साहित्य देसाईगंज तालुक्यातील एकलपूर गावाजवळील इटियाडोह प्रकल्पाच्या कॅनलमध्ये रात्रीच्या वेळी फेकून देण्यात आले. बरेच साहित्य हे कॅनलच्या बाजुला सांडल्याने परिसरातील गावातील लोकांनी बॅनरसारखे साहित्य घरी वापरण्यासाठी नेले व मोठ्या प्रमाणावर साहित्य पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. याबाबतची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांनी खा. अशोक नेते यांना दिल्यावर खा. नेते यांनी प्रत्यक्ष येथे जाऊन पाहणी केली व हा गंभीर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. या घटनेबाबत खा. अशोक यांना विचारणा केली असता, आपल्याला कार्यकर्त्यांकडून प्रचार साहित्य कॅनलजवळ पडून असल्याची माहिती मिळाली. तेथे आपण प्रत्यक्ष पाहणी केली. हे साहित्य कुणीतरी तेथे नेऊन टाकलेले आहे, ही बाब स्पष्ट आहे. निवडणूक काळात आपल्याला साहित्य मिळाले नव्हते. ज्यांच्याकडे ते आले, त्यांनी आता त्याची विल्हेवाट लावली. या संदर्भात पक्षस्तरावरून उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी आपण मागणी केली आहे, असे ते म्हणाले. एकूणच भारतीय जनता पक्षातील गटबाजी लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर उफाळून आली होती. या गटबाजीच्या राजकारणातूनच हा प्रकार घडल्या गेला असावा, अशी शक्यता पक्षाच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)