भामरागडचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी झाली कसरत
By Admin | Updated: June 26, 2015 00:13 IST2015-06-26T00:13:38+5:302015-06-26T00:13:38+5:30
मागील आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील दुर्गम भागातील विद्युत पुरवठा पूर्णत: खंडीत झाला होता.

भामरागडचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी झाली कसरत
भामरागड : मागील आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील दुर्गम भागातील विद्युत पुरवठा पूर्णत: खंडीत झाला होता. परंतु विद्युत कर्मचाऱ्यांनी सतत चार दिवस केलेल्या परिश्रमामुळे वीज पुरवठा २४ जून रोजी सुरळीत करण्यात झाला. कांदोळी, गोफनफुली, तुरमगुंडा, उदेडा परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
भामरागड तालुक्यात २० जून पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पाच दिवस कहर केला. तीन दिवसांत जवळपास ४७ मिली पाऊस झाला. एटापल्ली व भामरागड तालुक्यातून वाहणाऱ्या बांडिया नदीला पूर आल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. कांदोळी गावात वीज तारांवर चार झाडे पडली होती. तर भामरागड परिसरातील गोफनफुली गावात वीज तारांवर दोन झाडे पडली होती. तारांवर पडलेली संपूर्ण सहाही झाडे कापून वीज तारा मोकळ्या करण्यात आल्या. आपत्कालीन योजना म्हणून पडलेले खांब बायपास करून वीज तारांना ताणण्यात आले. तुमरगुंडा व उदेडा गावाजवळ वीज पडल्याने ७ पीन इंसुलेटर्सचे तुकडे झाले होते. विद्युत कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर तुकडे शोधून ते बदलविण्यात आले. लाईनमन मंगाम व कंत्राटी कामगार साई यांनी पोहून नदीपात्रातील वीज वाहिन्यांवर अडकलेल्या झाडाच्या फांद्या बाजूला केल्या. तसेच लाईनमन धकाले यांनी भर पावसात वीजा कडाडत असताना देखील इंसुलेटर्सचे तुकडे शोधून काढले. एटापल्लीचे उपकार्यकारी अभियंता राजेश खडसे व कनिष्ठ अभियंता आर. बी. पोहणकर, जे. टी, सानप व इतर कर्मचाऱ्यांनी झाडाला दोरखंड बांधून दोराच्या सहाय्याने पाण्यात जाऊन बिघाड शोधून काढला व वीज तारा ओढल्या. उपकेंद्र ५० ते ६० किमी दूर असतांनाही तसेच या भागात मोबाईल नेटवर्कचा अभाव व रस्त्यांची दुर्दशा असतांनाही वीज कर्मचाऱ्यांनी सतत चार दिवस परिश्रम घेत विद्युत पुरवठा सुरळीत केला. २४ जून रोजी दुपारी २ वाजता भामरागड येथील ३३ केव्ही लाईन चार्ज करण्यात आली. तसेच ११ केव्ही वाहिनी सुरू करण्यात आली. परंतु आलापल्ली येथील ६६ केव्ही वाहिनीत बिघाड झाल्याने कार्यकारी अभियंता हिवरकर यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांनी बिघाड शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ११ केव्ही वाहिनीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली.