भामरागडात रक्तपेढी द्या!

By Admin | Updated: February 9, 2017 01:38 IST2017-02-09T01:38:54+5:302017-02-09T01:38:54+5:30

जिल्ह्यातील अतिदुर्गम व मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यात १३० वर सिकलसेल रूग्ण आहेत.

Bhamragarad donate blood bank! | भामरागडात रक्तपेढी द्या!

भामरागडात रक्तपेढी द्या!

उपसंचालकांकडे मागणी : सिकलसेलग्रस्तांना अनेकदा जाणवते अडचण
भामरागड : जिल्ह्यातील अतिदुर्गम व मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यात १३० वर सिकलसेल रूग्ण आहेत. या रूग्णांना नेहमीच रक्ताची आवश्यकता भासत असते. रूग्णांना अहेरी व गडचिरोली येथील रूग्णालयात धाव घ्यावी लागते. परिणामी रूग्णांची गैरसोय होऊन प्रसंगी जीव गमवावा लागतो. ही गैरसोय टाळण्यासाठी भामरागड ग्रामीण रूग्णालयात रक्तपेढी सुरू करावी, अशी मागणी सांज संस्था व तालुक्यातील नागरिकांनी नागपूरच्या आरोग्य उपसंचालकांकडे केली आहे.
भामरागड येथील तहसीलदारांमार्फत आरोग्य उपसंचालकांना सदर निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, भामरागड ते अहेरी हे अंतर ७२ किमी असून रूग्णाला नेत असताना प्रवासात अनेक रूग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भामरागड येथे रक्तपेढी केंद्र देण्याची मागणी अनेकदा तालुक्यातील नागरिकांकडून करण्यात आली. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष झाले. तालुक्यात दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. या शिबिरात अनेकजण रक्तदान करतात. ६ फेब्रुवारीला रक्तदान शिबिर घेऊन ३४ बॅग रक्त अहेरी येथे जमा करण्यात आले आहे. येथील ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीत रक्त साठवण केंद्राकरिता खोलीही तयार करण्यात आली असून रक्त साठणव केंद्राकरिता आवश्यक असणारी उपकरणेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परंतु सदर उपकरणे धूळखात पडले असून रक्त साठवण केंद्र निर्माण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तत्काळ भामरागड येथे रक्तपेढी केंद्र निर्माण करावे, अशी मागणी सांज माडिया संस्थेचे रूपलाल गोंगले, सचिव शहनाज व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत आरोग्य उपसंचालकांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

 

Web Title: Bhamragarad donate blood bank!