कर्मचाऱ्यांविना भामरागडची सेवा ठप्प
By Admin | Updated: July 9, 2015 01:50 IST2015-07-09T01:50:59+5:302015-07-09T01:50:59+5:30
तालुक्यातील हेमलकसा येथे भारतीय दूरसंचार निगमचे केंद्र आहे. येथे कर्मचारी कार्यरत होते.

कर्मचाऱ्यांविना भामरागडची सेवा ठप्प
दूरध्वनी केंद्र वाऱ्यावर : वीज, दूरध्वनी, मोबाईल बंद
भामरागड : तालुक्यातील हेमलकसा येथे भारतीय दूरसंचार निगमचे केंद्र आहे. येथे कर्मचारी कार्यरत होते. त्यांचे स्थानांतरण झाल्यानंतर मागील चार-पाच वर्षांपासून एकही कर्मचारी आला नाही. तेव्हापासून दूरध्वनी केंद्राचा कारभार चौकीदार सांभाळत आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा बंद झाला की मोबाईल सेवा बंद पडते. अनेकदा रेंज पकडत नसल्याने भामरागडच्या नागरिकांना दूरध्वनी, मोबाईल फोनवरून बोलण्यासाठी हेमलकसाला जावे लागते. हेमलकसा येथील दूरसंचार केंद्राच्या मनोऱ्याची रेंज वाढवावी, अशी मागणी आहे.
मागील दहा वर्षांपासून यासंदर्भात मागणी करून पाठपुरावा करण्यात आला. परंतु अजूनपर्यंत याबाबत निर्णय झालेला नाही. येथे कार्यालयासाठी कर्मचारीही नेमण्यात आला नाही. केवळ एका सुरक्षा रक्षकाच्या भरवशावर मोबाईल सेवा अनियमितपणे सुरू आहे. याबाबत अनेकदा दूरसंचार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु काहीही उपयोग झाला नाही. आठवड्यात दोन दिवस ही सेवा सुरू राहते. त्यातही अनेकदा भामरागड कव्हरेजच्या बाहेर असल्याचे उत्तर मोबाईल देतो. तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे भ्रमणध्वनी सेवेच्या मनोऱ्याची रेंज वाढावी म्हणून पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु काहीही उपयोग झाला नाही.
कुणी मोठा अधिकारी, मंत्री येणार असला तर सेवा सुरळीत केली जाते. मात्र त्यानंतर पुन्हा सर्व आलबेल होते. वीज जाताच भ्रमणध्वनी, दूरध्वनीसेवा बंद पडून जाते. एकीकडे जिल्हाभर दूरसंचार विभाग थ्री-जी, फोर-जी सेवा पुरविण्यासाठी धडपत असताना भामरागडला मात्र असलेल्या साध्या सेवेसाठीही नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा काढावा, अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)