वर्षारंभीच गाढवी नदी झाली कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST2021-01-13T05:36:34+5:302021-01-13T05:36:34+5:30

महाराष्ट्र राज्य तथा गोंदिया जिल्ह्याच्या पूर्व सीमेजवळील ढासगढ येथून उगम पावणारी आणि हजारो मीटर अंतर पार करून गडचिरोली जिल्ह्याच्या ...

At the beginning of the year, the donkey river became dry | वर्षारंभीच गाढवी नदी झाली कोरडी

वर्षारंभीच गाढवी नदी झाली कोरडी

महाराष्ट्र राज्य तथा गोंदिया जिल्ह्याच्या पूर्व सीमेजवळील ढासगढ येथून उगम पावणारी आणि हजारो मीटर अंतर पार करून गडचिरोली जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या आरमोरी तालुक्यातील शिवणी येथे वैनगंगा नदीत विलीन होणारी गाढवी नदी विसोरा तसेच देसाईगंज तालुक्यातील शेतकरी, नागरिकांची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातून वाहताना दोन्ही किनाऱ्यावरील शेकडो हेक्टर शेतातील पिकांना पाणी पुरवते. गोंदिया, गडचिरोली हा घनदाट अरण्यप्रदेश असून या भागात दरवर्षी चांगला पाऊस पडतो.

नदीच्या प्रवाहात काठावरच्या शेतांमध्ये पाणी पुरवण्यासाठी हजारो मोटारपंप लावले आहेत. मात्र अर्जुनी तालुक्यातील गोठणगाव जवळच्या डोंगररांगांंच्या आड नदीचे पाणी अडवून इटीयाडोह धरण बांधले आहे. त्यामुळे नदीचा पाणी प्रवाह अनियमित झाला आहे. पावसाळ्यात धो-धो पाऊस आल्यावरच धरणाचे पाणी ओव्हर होऊन नदीतील पाणी प्रवाह संतत असतो. पण पाऊस बंद झाला आणि पाण्याचा ओव्हरफ्लो सुद्धा थांबतो आणि नदी पण कोरडी होण्यास सुरुवात होते. नदीच्या पात्रातील पाण्याचा वेग अनियंत्रित आणि जोराचा राहत असल्यामुळे रेतीचा चढउतार जागोजागी उभा होतो. त्यानेही पात्रातील पाण्याचा प्रवाह प्रभावित होतो. त्यामुळे काही ठिकाणी पात्र अरुंद झाले आहे. तसेच नदी काठावरचे झाडेझुडुपे तोडून नष्ट केली जात आहेत. त्याठिकाणी पात्र पसरट झाले आहे. हा सर्व परिणाम नैसर्गिक आहे.

परंतु नदीचा पाणी प्रवाह बंद होण्यास मानवनिर्मित कारणेही आहेत. पावसाळ्यात नदी प्रवाहातील पाण्याला जोरदार वेग असतो. परिणामी पाण्याच्या प्रवाहातील सर्व अडथळे दूर सारून पाणी प्रवाहित होते. जेव्हा पावसाळा संपला म्हणजे ऑक्टोबर नंतर नदीच्या पात्रात जेसीबी यंत्राने खोल खड्डे खोडून त्यात मोटारपंप लावले जातात. रेतीची पार बांधून पाणी अडविले जाते. त्यामुळे अल्पावधीत नदीचा प्रवाह कोरडा होतो. नदीकाठापासून काही नजीक वसलेल्या गावातील नागरिकाचा मृत्यू झाल्यास नदीच्या पात्रात मृतदेह जाळले जातात. त्यासाठी मोठाले लाकडी अर्धवट जळालेल्या अवस्थेत नदी पाण्यात तसेच फेकले जातात. तसेच गेली कित्येक वर्षांपासून स्वच्छ न केलेले नदी पात्र स्वच्छ करणे गरजेचे आहे.

नदी निव्वळ पाण्याला वाहून नेणारी एवढेच तिचे महत्त्व नाही तर प्राणी, पक्षी, वनस्पती, माती या सर्वाँच्या अनमोल अशा जैविविधतेला समृद्ध करणारी नैसर्गिक देणगी आहे. नदीकाठच्या शेतात धानपीक, अन्य खरीप, रब्बी पीके घेतली जातात. याही वेळी पीक लागवड सुरू आहे वा झाली आहे. तसेच उत्पादन सुद्धा बाजारात दाखल झाले आहे. नदीच्या पाण्यावर शेती पिकत असल्यामुळे अनेक कुटुंबांचा चरितार्थ सुरळीत चालत आहे. नदी कोरडी झाली कि पात्रात जागोजागी पाण्यासाठी खड्डे खोदलेले दिसून येतात. त्यामुळे पाणी तिथेच थांबते आणि प्रवाह बंद होतो. आता नदीच्या पात्रातील झाडे तोडून तिथे शेतीही केली जात आहे. याकडे पर्यावरण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होते आहे

Web Title: At the beginning of the year, the donkey river became dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.