चामोर्शीतील तलावाचे सौंदर्यीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:33 IST2021-03-15T04:33:00+5:302021-03-15T04:33:00+5:30
चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त ...

चामोर्शीतील तलावाचे सौंदर्यीकरण करा
चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही, त्यामुळे शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. तलावालगत काही नागरिकांनी शेणखताचे ढिगारे ठेवले आहेत. शेणाच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.
ग्रामपंचायत संगणक योजनेचा बोजवारा
सिरोंचा : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनतेची कामे तत्काळ व्हावीत, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायतींना संगणक संच पुरविले. मात्र, अनेक संगणक नादुरुस्त स्थितीत असून काही धूळखात आहेत. परिणामी, ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन कामाचा बोजवारा उडाला आहे.
शासकीय विहिरीवर खासगी पंपांचा कब्जा
काेरची : तालुक्यातील अनेक शासकीय विहिरींवर खासगी पाणीपंप लावण्यात आले आहेत. मात्र, याबाबत ग्रामीण भागातील नागरिक तक्रार करत नाहीत. ग्रामपंचायतीने स्वत: दखल घेऊन अशाप्रकारच्या अवैध मोटार काढणे आवश्यक असतानाही दुर्लक्ष केले आहे.
परवानगीविनाच घरांचे बांधकाम वाढले
देसाईगंज : नगरपरिषद क्षेत्रात घराचे बांधकाम करायचे असेल तर नगरपरिषदेकडून रितसर परवानगी घ्यावी लागते. मात्र, शहरातील बहुतांश घरमालक नगरपरिषदेकडे परवानगी न घेताच घरांचे बांधकाम करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. नगरपरिषदेने कारवाई करण्याची गरज आहे.
ठेंगण्या व अरूंद पुलाचा प्रश्न कायमच
गडचिरोली : ब्रिटिशकाळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील आष्टीचा पूल ठेंगणा व अरूंद असल्यामुळे या पुलावरून आजवर अनेकांचा वाहन कोसळून बळी गेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ठेंगणे व अरूंद पूल हे वाहतुकीसाठी ग्रामीण भागात नेहमीच अडचणीचे ठरलेले आहेत.
साखरा बसथांब्यावर गतिरोधक उभारा
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने साखरा येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधकाअभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत. साखरा बसथांब्याजवळ गतिराेधक नसल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे.
वनविभागावर वाढला रिक्त पदांचा भार
आलापल्ली : जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात २ हजारांपेक्षा अधिक वनकर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत चालला असून लाकूड तस्करी थांबविणे अशक्य झाले आहे.
डास व कीटकांमुळे आरोग्य धोक्यात
एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपन स्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी डास व कीटकांची उत्पत्ती होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपरिषदेने फवारणी करून डास व कीटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. नाल्यांमध्ये फवारणी न केल्यास आजाराची साथ पसरू शकते.
मोहझरीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. सदर रस्ते दुरूस्त करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणाने बनला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरूस्ती झाली नाही. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
बसथांब्यानजीक शौचालय बांधा
चामोर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी बसथांब्यावरून भेंडाळा, मूल, चामोर्शी, आष्टी, गोंडपिंपरी व चपराळा आदी ठिकाणांसाठी दररोज बसेस जातात. या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे येथे शौचालय व मुत्रीघर उभारण्यात यावे, अशी मागणी लखमापूर बोरी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पिशव्यांनी जनावरांचे आरोग्य धोक्यात
गडचिरोली : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लास्टिक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
जीर्ण शाळा इमारती कायमच
चामोर्शी : तालुक्यासह जिल्हाभरात जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या अनेक जुन्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. पावसामुळे जीर्ण इमारती कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही. सतत मागणी करूनही जीर्ण इमारती निर्लेखित केल्या नाहीत.
चामोर्शीत बांधकाम साहित्य रस्त्यावर
चामाेर्शी : शहरातील विविध भागांत घरांचे बांधकाम सुरू असून बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून अपघाताची शक्यता वाढली आहे. बांधकाम साहित्य हटविण्याची मागणी आहे.
वैयक्तिक शौचालयांची गावांत कमतरता
गडचिराेली : अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली आदी दुर्गम तालुक्यातील अनेक गावांमध्ये वैयक्तिक शौचालये फारच कमी प्रमाणात आहेत. जिल्ह्यात १०० टक्के शौचालय असणारे एकही गाव नाही. यामुळे गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे आजारांत वाढ होत आहे. ग्रामीण नागरिक मुख्य रस्त्यावरच शौचास बसतात.
खुल्या जागा ठरताहेत कुचकामी
देसाईगंज : नगरपालिका क्षेत्रात अनेक वाॅर्डांमध्ये ओपन स्पेस आहेत. मात्र, काही मोजक्याच ओपन स्पेसला संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या ओपन स्पेसला संरक्षण भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. न.प. ने शहरातील सर्वच ओपन स्पेसचा विकास करण्याची मागणी आहे.
शहरातील नाल्यांमध्ये फवारणीची मागणी
सिरोंचा : येथील अनेक वॉर्डातील डासांमुळे शहरात आजाराचे प्रमाण वाढले असून अनेक घरी लोक तापाने फणफणत आहेत. सर्दी, पडसेसह अन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे नाल्यांचा उपसा करून सर्वच वाॅर्डातील नाल्यांमध्ये फवारणी करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.
अनेक दिशादर्शक फलक बेपत्ता
एटापल्ली : अहेरी उपविभागातील मार्गावर लावण्यात आलेले अनेक ठिकाणचे दिशादर्शक फलक बेपत्ता झाले आहे. यामुळे रात्री अनोळखी नागरिक तसेच वाहनचालक रस्ता विसरून भलतीकडेच वळतात. संबंधित यंत्रणेने अशा ठिकाणी दिशादर्शक फलक लावावे, अशी मागणी आहे.
ऑनलाईन सुविधेपासून ग्रामपंचायती वंचित
गडचिरोली : ग्रामपंचायत स्तरावरील संपूर्ण दस्तावेज ऑनलाईन करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपये खर्च होत आहेत. मात्र, अजूनही बऱ्याचशा ग्रामपंचायती ऑनलाईन झाल्या नाहीत. त्यामुळे आधुनिक सुविधांपासून वंचित आहेत.