गडचिरोली : शनिवारचा अर्धा दिवस, रविवारची सुटी यामुळे सोमवारी सर्वच बँकांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी जमली होती. मात्र बँकेची लिंक फेल असल्याने ग्राहकांना आल्यापावली परत जावे लागले. त्याचबरोबर एटीएमही सकाळपासूनच बंद असल्याने ग्राहकांच्या अडचणीत आणखी भर पडली. जवळपास प्रत्येक नागरिकाचे बँकांमध्ये खाते आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक व व्यापारी बँकेच्या माध्यमातूनच आर्थिक व्यवहार करतात. सर्वच बँकांचे व्यवहार आॅनलाईन झाले असल्याने बँक व्यवहार सुरू राहण्यासाठी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. शनिवारी बँकेचे १ वाजेपर्यंतच कामकाज चालते. त्यामुळे या दिवशी बहुतांश व्यापारी व नागरिक बँकेत आर्थिक व्यवहारांसाठी न येता, सरळ सोमवारी बँकेत येणे पसंत करतात. रविवारी गडचिरोली येथे बाजार भरत असल्याने सर्वाधिक आर्थिक उलाढाल याच दिवशी होते. या दिवशी जमा झालेला पैसा सोमवारी बँकेमध्ये भरल्या जाते. त्यानुसार आज व्यापारी व नागरिक बँकेत पैसे टाकण्याबरोबरच आवश्यक असलेले पैसे काढण्यासाठी आले असता, दुपारी २.३० नंतर लिंक फेल झाल्याने बँक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाला. त्यामुळे रांगेत लागलेल्या नागरिक व व्यापाऱ्यांना आर्थिक व्यवहार न होता परत जावे लागले. त्यामुळे आता तीन दिवसांचे पैसे स्वत:कडेच ठेवावे लागणार आहेत. गडचिरोली तालुक्यात काही अपवादात्मक गावे वगळता राष्ट्रीकृत बँकाच नाहीत. त्यामुळे ३० ते ४० रूपये तिकीट खर्चुन हे नागरिक गडचिरोली येथे आले होते. तासभर रांगेमध्ये उभे राहिले. मात्र वेळेवरच लिंक फेल झाल्याने या नागरिकांनाही परत जावे लागले. त्यामुळे वृद्ध नागरिकांच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसून येत होता. विशेष म्हणजे आज सकाळपासूनच लिंक फेल असल्याने शहरातील एसबीआय, बँक आॅफ इंडिया यांच्यासह इतर बँकांचे सर्वच एटीएम बंद होते. त्यामुळे पैसे काढणाऱ्या सामान्य ग्राहकांना अडचण झाली. एटीएमचा दरवाजा बंद असलेला बघून दुरूनच परत जात होते. बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ७ जानेवारी रोजी संप घोषित केला आहे. त्यामुळे याही दिवशी बँक व्यवहार ठप्प राहणार आहेत. परिणामी आता बँक व्यवहार करण्यासाठी केवळ उद्याचा दिवस शिल्लक आहे. उद्याही हिच परिस्थिती राहिल्यास आर्थिक समस्या तीव्र होणार आहे. (नगर प्रतिनिधी)
लिंक फेलमुळे बँक व्यवहार ठप्प
By admin | Updated: January 5, 2015 23:03 IST