जिल्ह्यात रिक्त पदांचा अनुशेष कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST2021-02-06T05:09:58+5:302021-02-06T05:09:58+5:30
गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक विभागांत रिक्त पदे असल्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. एकाच कामासाठी १५-१५ दिवस शासकीय कार्यालयात ...

जिल्ह्यात रिक्त पदांचा अनुशेष कायमच
गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक विभागांत रिक्त पदे असल्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. एकाच कामासाठी १५-१५ दिवस शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याने नागरिकांमध्ये शासनाप्रती तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
डास निर्मूलनासाठी फवारणीची मागणी
गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असून, अनेक आजार पसरत आहेत. म्हणून डास निर्मूलनासाठी फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चपराळा पर्यटन स्थळ विकासाच्या प्रतीक्षेत
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मात्र याठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा.
देलनवाडीतील रस्त्यांवर अतिक्रमण कायम
आरमोरी : तालुक्यातील देलनवाडी येथील अंतर्गत रस्त्यांवर नागरिक व व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने गावातील रस्ते अरूंद झाले आहेत. मात्र या सर्व प्रकाराकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. गावातील नागरिक सरपण, लाकडे, शेणखताचे ढिगारे, बांधकाम साहित्य तसेच व्यावसायिक विविध वस्तू ठेवत आहेत.
कॉम्प्लेक्स मार्गावरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष
गडचिरोली : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अनेक शासकीय कार्यालयांसाठी इमारतींचे बांधकाम सुरू झाले आहे. त्यामुळे या परिसरात भविष्यात नागरिकांची गर्दी वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्य रस्त्याच्या बाजूला तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गावर अतिक्रमणाची संख्या वाढली आहे.
प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा अस्ताव्यस्त वाहने
कुरखेडा : कुरखेडा मार्ग तसेच विश्रामगृह परिसरात नेहमीच पार्किंग केलेली वाहने रस्त्याच्या कडेला दिसून येतात, तर दुसऱ्या बाजूला ट्रान्सपोर्ट करणारे मालवाहू ट्रक उभे करून त्यातील माल उतरविण्यापासून सर्व कारभार रस्त्यावरच चालत असतो. येथे वाहतुकीसाठी अत्यंत कमी जागा शिल्लक राहते. या ठिकाणचे अतिक्रमण हटवून मार्ग मोकळा करून देणे गरजेचे आहे.
भामरागड तालुक्यातील गावांना विजेची प्रतीक्षा
भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील अनेक गावांत विजेचे खांब उभे करण्यात आले. त्यावर ताराही ओढण्यात आल्या. मात्र यावर वीज पुरवठा सुरू करण्यात आला नाही. सातत्याने मागणी करूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्गम गावांमध्ये वीज पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
बसमधील घाणीची स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष
आरमोरी : राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारातील अनेक बसेसमध्ये घाण पसरली आहे. प्रवाशांना घाणीच्या ठिकाणीच बसावे लागत आहे. अनेक बसमधील आसनेही तुटल्याने प्रवाशांना प्रवासात त्रास होत आहे. मात्र याकडे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. अनेक बसगाड्यांची दुरवस्था आहे.