सेना पदाधिकाऱ्यांची रूग्णालयावर धडक
By Admin | Updated: February 9, 2015 23:12 IST2015-02-09T23:12:49+5:302015-02-09T23:12:49+5:30
गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागात आरोग्य सेवांचा अभाव असल्याने संपूर्ण जिल्ह्यातून रूग्णांचा भार हा जिल्हा सामान्य रूग्णालयावर येऊन पडतो. त्यामुळे जिल्हा

सेना पदाधिकाऱ्यांची रूग्णालयावर धडक
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागात आरोग्य सेवांचा अभाव असल्याने संपूर्ण जिल्ह्यातून रूग्णांचा भार हा जिल्हा सामान्य रूग्णालयावर येऊन पडतो. त्यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालयाचे नियोजन कोलमडून पडले आहे. या मागे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे रिक्त असलेले पद हे ही एक महत्त्वाचे कारण आहे.
जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी नवजात शिशूच्या मृत्यूचे प्रकरण घडले. त्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयावर धडक देऊन तेथील आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती जाणून घेतली.
दुर्गम व ग्रामीण भागातून अनेक गरीब लोक जिल्हा सामान्य रूग्णालयात बाळंतपणासाठी आपल्या कुटुंबातील रूग्णालया घेऊन येतात. परंतु या ठिकाणी डॉक्टरांच्या अनास्थेपणामुळे शिशू जगेल की, नाही अशी परिस्थिती निर्माण होते, असा आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हरिष मने यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चेदरम्यान केला. बऱ्याच गरीब रूग्णांना उपचारासाठी नागपूरला जाण्याचा सल्ला दिला जातो, असेही मने यावेळी म्हणाले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रूग्णालयात डॉक्टरांची पद रिक्त आहेत, अशी माहिती यावेळी सेना पदाधिकाऱ्यांना दिली. गरीब लोकांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास होणार नाही, याची काळजी रूग्णालयाच्या प्रशासनाने व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही सेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांना सांगितले.
याप्रसंगी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजू अंबानी, नंदू कुंभारे, तेजस नरड, मृणाल राऊत, दिपक मडके, ग्रा.पं. सदस्य प्रशांत सोमकुंवर व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आरोग्य विषयक विविध समस्या यावेळी डॉ. रूडे यांनी सेना पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्यात व आरोग्य सेवा सक्षम व चांगली करण्याच्या दृष्टीने आमचा नेहमीच प्रयत्न राहतो, असेही स्पष्ट केले. उल्लेखनिय बाब म्हणजे, नवजात शिशूच्या मृत्यूनंतर आरोग्यमंत्र्यांनी माहितीही जाणली होती. (प्रतिनिधी)