आलापल्ली-सिरोंचा मार्ग देताहे अपघाताला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:01:40+5:30
आलापल्ली ते सिरोंचापर्यंतचा मुख्य रस्ता गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे उखडून गेला आहे. या मार्गावरील खड्डे पाहिल्यानंतर रस्ता कमी आणि खड्डेच जास्त झाल्यामुळे वाहनचालकांना वाहने नेताना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाच्या आधी हा रस्ता दुरूस्त होईल अशी अपेक्षा केली जात होती. पण उन्हाळा संपत आला तरी हा रस्ता दुरूस्त करण्यात आला नसल्यामुळे संबंधित विभागाला एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे की काय? असा संतप्त सवाल नागरिक व्यक्त करत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : आलापल्ली ते सिरोंचापर्यंतचा मुख्य रस्ता गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे उखडून गेला आहे. या मार्गावरील खड्डे पाहिल्यानंतर रस्ता कमी आणि खड्डेच जास्त झाल्यामुळे वाहनचालकांना वाहने नेताना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाच्या आधी हा रस्ता दुरूस्त होईल अशी अपेक्षा केली जात होती. पण उन्हाळा संपत आला तरी हा रस्ता दुरूस्त करण्यात आला नसल्यामुळे संबंधित विभागाला एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे की काय? असा संतप्त सवाल नागरिक व्यक्त करत आहेत.
हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे गेला आहे. या मार्गाचे रुंदीकरण करून नव्याने बांधणी करण्यास अजून बराच वेळ आहे. पण तोपर्यंत अशा खड्डेमय रस्त्यावरून मार्गक्रमण करणे दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी धोकादायक झाले आहे. याबद्दल अनेक लोकांनी खासदार अशोक नेते यांच्याकडे या रस्त्याबद्दल तक्रारी केल्या. रस्त्याचे यापूर्वी झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळेच एवढी दुरवस्था झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे त्या कामाची चौकशी करण्याचे निर्देश खा.अशोक नेते यांनी दिले. तसेच या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची सूचनाही त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. पावसाला सुरूवात होण्याआधी दुरूस्ती केली नाही तर मोठे हाल होणार आहेत.