आलापल्ली-भामरागड मार्ग बंद
By Admin | Updated: September 2, 2016 01:25 IST2016-09-02T01:25:29+5:302016-09-02T01:25:29+5:30
भामरागड-आलापल्ली मार्गावर ताडगावजवळ नाला तुडूंब भरून वाहत असल्याने जवळजवळ सहा तास या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती

आलापल्ली-भामरागड मार्ग बंद
सहा तास वाहतूक राहिली ठप्प : बोटनफुंडी, ताडगाव नाल्यावर तीन फूट पाणी
गडचिरोली/भामरागड : भामरागड-आलापल्ली मार्गावर ताडगावजवळ नाला तुडूंब भरून वाहत असल्याने जवळजवळ सहा तास या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे आलापल्ली व भामरागड भागाकडून वाहने या नाल्याजवळ उभे होते. जवळजवळ चार तास ही वाहतूक ठप्प राहिली. भामरागड-आलापल्ली मार्गावर ताडगाव, बोटनफुंडी हे दोन नाले लागतात. गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस होत असल्याने भामरागड परिसरात नाले तुडूंब वाहत आहेत. त्यामुळे हा मार्ग आज बंद झाला.
गडचिरोली जिल्ह्यात १ सप्टेंबरच्या सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात अहेरी येथे ६.४, एटापल्ली येथे ६.८, धानोरा येथे ०.९, कोरची येथे १.७, भामरागड येथे १ मीमी पावसाची नोंद घेण्यात आली. जिल्ह्यात सरासरी १.६ मीमी पाऊस गुरूवारी झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ११५०.४ मीमी पाऊस झाला असून आतापर्यंत या पावसाळ्यात ८४.९ टक्के पाऊस झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे प्रमुख कृष्णा रेड्डी यांनी लोकमतला दिली आहे.
भामरागड तालुक्यात ताडगाव, बोटनफुंडी या दोन्ही नाल्यांना पूर आल्याने तीन फूट पाणी रस्त्यावर आले होते.
बोटनफुंडी, विसामुंडी, वठेली, कत्रनगट्टा आदी गावांचा भामरागड परिसराशी संपर्क तुटलेला होता. गुरूवारी दुपारी गडचिरोलीसह जिल्ह्यात चांगल्या पावसाच्या सरी आल्या. त्यामुळे बळीराजाने पावसातच बैल पोळ्यात नेले. पाऊस आल्यामुळे पोळा सणावर विरजन पडले असले तरी धानपिकाला या पावसाचा मोठा लाभ होणार असल्याने ग्रामीण भागात पोळा सणाला शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. (तालुका प्रतिनिधी)