अहेरीतील दूरसंचार सेवा कोलमडली
By Admin | Updated: September 3, 2016 01:28 IST2016-09-03T01:28:40+5:302016-09-03T01:28:40+5:30
मागील १५ दिवसांपासून अहेरीतील भारत संचार निगम लिमिटेडच्या टॉवरमध्ये बिघाड निर्माण झाला असल्याने कॉलड्राप होण्याचे प्रमाण वाढले आहे.

अहेरीतील दूरसंचार सेवा कोलमडली
कॉलड्राप होण्याचे प्रकार वाढले
अहेरी : मागील १५ दिवसांपासून अहेरीतील भारत संचार निगम लिमिटेडच्या टॉवरमध्ये बिघाड निर्माण झाला असल्याने कॉलड्राप होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बीएसएनएलचे ग्राहक त्रस्त झाले आहेत.
मोबाईलवर बोलत असतानाच अचानक पूर्णपणे कव्हरेज जाणे, समोरच्या व्यक्तीचा आवाज न येणे, अर्ध्यामध्येच फोन कटने, फोन न लागताच पैसे कटण्यास सुरूवात होणे याबाबी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अहेरी व अहेरी परिसरातील मोबाईलधारक कमालीचे त्रस्त झाले आहे. बीएसएनएलच्या चुकीमुळे ग्राहकांना आर्थिक भूर्दंड बसत आहे. याबाबत काही नागरिकांनी अहेरी व गडचिरोली येथील कार्यालयाकडे तक्रारही दाखल केली आहे. मात्र नित्याचीच बाब समजून बीएसएनएलचे अधिकारी टॉवरमधील बिघाड दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत आहेत. अहेरी येथे भामरागड, सिरोंचा, एटापल्ली येथीलही नागरिक कामानिमित्त येतात. त्यामुळे मोबाईलधारकांची संख्या वाढली आहे. परिणामी दिवसभरात कॉलड्राप होण्याचे प्रकार वाढले असल्याने मोबाईल ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. (प्रतिनिधी)