अहेरी जिल्ह्याला अद्यापही ‘रेड सिग्नल’
By Admin | Updated: February 8, 2015 23:46 IST2015-02-08T23:46:27+5:302015-02-08T23:46:27+5:30
राज्य सरकारच्यास्तरावर काही नवीन जिल्हे व नवे तालुके निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. अहेरी जिल्ह्याची जुनी मागणी असून अद्यापही शासनाकडे

अहेरी जिल्ह्याला अद्यापही ‘रेड सिग्नल’
गडचिरोली : राज्य सरकारच्यास्तरावर काही नवीन जिल्हे व नवे तालुके निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. अहेरी जिल्ह्याची जुनी मागणी असून अद्यापही शासनाकडे याबाबतचा प्रस्ताव नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अहेरी जिल्हा निर्मितीला पुन्हा रेड सिग्नलच असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात जवळजवळ सात नवीन जिल्हे निर्माण करण्याबाबत मागणी मागील अनेक वर्षांपासून शासनाकडे होत आहे. सध्या नव्या सरकारने अमरावती जिल्ह्यात नवीन तीन तालुके निर्माण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. यामध्ये आसेगाव पूर्णा, बडनेरा, चुरणी हे नवे तालुके निर्माण करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात १४ ऐवजी १७ तालुके होतील. राज्य सरकारकडे अनेक नवीन जिल्हे निर्माण करण्यासाठी मागणी आहे. यामध्ये अमरावतीचे विभाजन करून अचलपूर, नागपूरचे विभाजन करून काटोल, चंद्रपूरचे विभाजन करून चिमूर, यवतमाळचे विभाजन करून पुसद, गडचिरोलीचे विभाजन करून अहेरी जिल्हा निर्माण करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अहेरी उपविभागातील तालुक्यांचा अंतर हे अडीचशे ते साडेतीनशे किमीच्या अंतरावर आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना गडचिरोली येथे प्रशासकीय कामासाठी येताना आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणावर येतो. ही बाब लक्षात घेऊन अहेरी जिल्हा निर्माण करावा, अशी मागणी जोर धरत आहे. राज्य सरकारने सध्या नवे तालुके व जिल्हे निर्माण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या विभाजनाचा कोणताही प्रस्ताव शासनस्तरावर नसल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अहेरी उपविभागावर जिल्हा निर्मितीबाबत प्रतीक्षेची पाळी येणार आहे.