मृत्यूनंतरही मृतदेह भोगतात यातना
By Admin | Updated: April 25, 2015 01:43 IST2015-04-25T01:42:18+5:302015-04-25T01:43:08+5:30
मागील दोन वर्षांपासून अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहातील शीतपेटी बंद अवस्थेत आहे.

मृत्यूनंतरही मृतदेह भोगतात यातना
प्रतीक मुधोळकर अहेरी
मागील दोन वर्षांपासून अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहातील शीतपेटी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे मृतदेह बाहेर ठेवावा लागत असून अनेक मृतदेहाची दुर्गंधीही सुटत असल्याच्या घटना घडल्या आहेत. शवविच्छेदन गृहातील विद्युत पुरवठा बंद असल्याने एका सोलर लाईटच्या भरवशावर शवविच्छेदन करावे लागत आहे. त्यामुळे मृतदेहावर मृत्यूनंतरही यातना सहन करण्याची पाळी येत आहे.
अहेरी उपजिल्हा रुग्णालयात भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा व अहेरी तालुक्यातील अनेक दुर्गम भागातून नागरिक उपचारासाठी येतात. कधीकधी उपचारादरम्यान रुग्णांचा मृत्यू सुद्धा होतो. मात्र आर्थिकदृष्ट्या प्रबळ नसलेल्या गरीब जनतेला मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर लगेच मृतदेह स्वगावी नेणे शक्य नाही. त्यासाठी अहेरी उपजिल्हा रूग्णालयाला प्रशासनाने शीतपेटी उपलब्ध करून दिली आहे. मात्र सदर शीतपेटी बंद असल्याने रात्रभर मृतदेह शवगृहात बाहेरच ठेवावा लागतो. उन्हाळ्याच्या दिवसात रात्रभर मृतदेह राहल्याने सदर मृतदेहाची दुर्गंधीही सुटते. नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने नेहमी चकमकीच्या घटना घडतात. नक्षल्याकडून हत्या तसेच अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर होतात. या घटनांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीला शवविच्छेदनासाठी रूग्णालयात आणले जाते. रात्रीच्या वेळेस शवविछेदन केल्यास मृतदेह गावाकडे नेण्यासाठी वेळेवर वाहन उपलब्ध होत नाही. अशा वेळी मृतदेह रूग्णालयात ठेवावे लागतो. शव विच्छेदन गृहाचा विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे त्याच्या स्वच्छतेवरही दुर्लक्ष होत आहे. साफसफाईसाठी येथे पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही. त्यामुळे पूर्वी झालेल्या शवविच्छेदनाचे रक्त ओट्यावरच पडून असते. त्यातून अनेकदा दुर्गंधी येते. विच्छेदन गृहाचे दरवाजे सुद्धा तुटलेले आहेत. त्यामुळे शव ठेवले असतांना कुत्रे किंवा अन्य प्राणी मृतदेहाचे लचके तोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शवविच्छेदन गृहाला लागूनच जिल्हा परिषदेचे विश्रामगृह आहे व पुढील भागात नागरिकांची घरे आहेत. त्यांना सुद्धा या दुर्गंधीचा सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे. शवविच्छेदनानंतर रक्ताने माखलेले कपडे सुद्धा तिथेच फेकल्या जातात. सोलर लाईट लागण्याच्या आधी विद्युत नसल्यामुळे मेणबत्ती किंवा टॉर्चच्या सहाय्याने शवविच्छेदन केल्या जात होते.