प्रशासन लाभार्थ्यांच्या दारी
By Admin | Updated: December 10, 2014 22:57 IST2014-12-10T22:57:59+5:302014-12-10T22:57:59+5:30
आम आदमी विमा योजनेसाठी लाभार्थ्यांची शोधमोहीम ९ ते २० डिसेंबर दरम्यान राबविली जाणार असून या योजनेची सुरूवात पाटणवाडा येथून करण्यात आली आहे.

प्रशासन लाभार्थ्यांच्या दारी
वैरागड : आम आदमी विमा योजनेसाठी लाभार्थ्यांची शोधमोहीम ९ ते २० डिसेंबर दरम्यान राबविली जाणार असून या योजनेची सुरूवात पाटणवाडा येथून करण्यात आली आहे.
आम आदमी विमा योजनेंतर्गत शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा विमा काढला जातो. सदर योजना राज्य शासनाने २७ आॅक्टोबर २००७ पासून सुरूवात केली आहे. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजूर, १ हेक्टर बागायत किंवा २ हेक्टर जमिनधारकाच्या पाल्यांना दिला जातो. या योजनेंतर्गत विद्यार्थ्याच्या संपूर्ण कुटुंबाला विमा संरक्षण देण्यात येते. १८ ते ५९ वयोगटात आकस्मिक मृत्यू, अपंगत्व आल्यास थोडाफार आर्थिक लाभ मिळावा, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. विमाधारकाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार रूपये, अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रूपये व अपंगत्व आल्यास ३७ हजार ५०० रूपये असे विमा संरक्षण देण्यात येते. याशिवाय ९ वी ते १२ वीचे शिक्षण घेणाऱ्या दोन अपत्यांना १०० रूपये महिना शिष्यवृत्तीसुद्धा देण्यात येते.
वैरागड ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असलेल्या पाटणवाडा येथे गावबैठक बोलावून नागरिकांना या योजनेची माहिती देण्यात आली. यावेळी तलाठी डी. एल. कुबडे, ग्रामसेवक घुटके, पोलीस पाटील परसराम कुमरे, सरपंच सेवानंद सहारे, एकनाथ सहारे, मन्सराम कुमरे, माणिक कुमरे, रामटेके उपस्थित होते.
योजनांचा लाभ घेण्यासाठी आजपर्यंत नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेक दाखले जोडूनही अर्जात त्रुट्या दाखवून योजनांपासून वंचित ठेवल्या जात असल्याचा प्रत्येक नागरिकाचा अनुभव आहे. आम आदमी विमा योजनेबाबत मात्र या उलट परिस्थिती दिसून येत आहे. कर्मचारीच लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचून योजनेची माहिती लाभार्थ्यांना देत आहेत. हे चित्र बघून पाटणवाडा येथील नागरिकही आश्चर्यचकीत झाले आहेत. पाटणवाडा गावाची २ हजार लोकसंख्या असून या गावातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याचा शोध घेऊन योजनेचा लाभ दिला जाईल, अशी माहिती लोकमतशी बोलतांना उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी दिली. नागरिकांनीसुद्धा स्वत: अर्ज करावे, असे आवाहनही कर्मचाऱ्यांनी केले. (वार्ताहर)