गडचिरोली : तीन आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा दौऱ्यावेळी भेट दिलेल्या छत्तीसगड सीमेवरील कवंडे येथे घातपात घडवून आणण्याकरता रेकी करत असताना एका जहाल माओवाद्याला २७ जून रोजी पोलिसांनी जेरबंद केले. अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो (२८,रा. कवंडे ता. भामरागड) असे त्याचे नाव आहे. कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा येथे सहा वर्षांपूर्वी भूसुरुंग स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यातही त्याचा सक्रिय सहभाग होता.
एकेकाळी माओवाद्यांचे आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवंडे येथे पोलिसांनी माओवादविरोधी अभियान गतिमान केले आहे.२७ जून रोजी कवंडे जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथकाची दोन पथके, कवंडे येथील पोलिस पथक आणि राज्य राखीव दलाच्या कंपनी ३७ बटालियनचे एक पथक माओवादविरोधी अभियान राबवित होते. यावेळी त्यांना एक संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आल्याने त्याला ताब्यात घेतले होते. पोलिस मुख्यालयात आणून त्याची चौकशी केली असता तो अंकल उर्फ मन्नू सुलगे पल्लो असल्याचे निष्पन्न झाले. सध्या तो कोरची दलममध्ये उपकमांडर म्हणून कार्यरत होता.
कवंडे जंगल परिसरात घातपात करण्याकामी रेकी करण्यासाठी आल्याची कबुली त्याने दिली. त्याच्यावर पाच गुन्हे नोंद असून तपासकामी त्यास कुरखेडा पोलिसांच्या ताब्यात दिले. २८ रोजी त्यास कुरखेडाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल,अपर अधीक्षक एम. रमेश, श्री. सत्य साई कार्तिक, उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व भामरागडचे उपअधीक्षक अमर मोहिते, कुरखेडाचे उपअधीक्षक रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कवंडेचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक मंदार शिंदे, विशेष अभियान पथक तसेच सीआरपीएफ ३७ बटा. सी-कंपनीचे अधिकारी व जवान यांनी पार पाडली.
दोन मोठ्या हल्ल्यांत सहभाग२ मे २०२९ रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा जंगल परिसरात झालेल्या भुसुरुंग स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यामध्ये अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो याचा सक्रिय सहभाग होता. यासोबतच खोब्रामेंढा जंगलात २९ मार्च २०२१ रोजी झालेल्या चकमकीतही तो सामील होता. त्याच्यावर शासनाचे सहा लाखांचे बक्षीस होते.
१३ व्या वर्षी नक्षल चळवळीत
वयाच्या तेराव्या वर्षीच अंकल उर्फ मन्नू पल्लो हा नक्षल चळवळीत दाखल झाला. मूळचा कवंडेचा असलेल्या अंकल २०१२ मध्ये छत्तीसगडमधील माओवाद्यांच्या निब कंपनीतून सदस्य पदावर भरती झाला. २०२७ मध्ये तो भामरागड दलममध्ये बदली होऊन आला. २्०१७ ते २०२० या दरम्यान कोरची दलममध्ये उपकमांडर म्हणून त्याने काम केले. २०२० पासून तो महाराष्ट्र -छत्तीसगड सीमेवर कवंडे जंगल परिसरात राहून माओवादी चळवळीत काम करायचा.