जिल्ह्यातील ३० टक्के लोकांकडे रेशनकार्डच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:00 IST2020-04-08T05:00:00+5:302020-04-08T05:00:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : १२ लाख लोकसंख्येच्या गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ३० टक्के लोक अजूनही रेशन कार्डपासून वंचित आहेत. ...

About 30 percent of the people in the district do not have ration card | जिल्ह्यातील ३० टक्के लोकांकडे रेशनकार्डच नाही

जिल्ह्यातील ३० टक्के लोकांकडे रेशनकार्डच नाही

ठळक मुद्देमोफत धान्य वाटपात अडसर : तीन लाखांवर नागरिकांची सोय करण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : १२ लाख लोकसंख्येच्या गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ३० टक्के लोक अजूनही रेशन कार्डपासून वंचित आहेत. पात्र असूनही केवळ रेशन कार्ड नसल्यामुळे शासनाच्या धान्य वाटप योजनेपासून दूर असलेल्या त्या नागरिकांना संचारबंदीच्या काळात राज्य शासनाकडून मिळणारे प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य कसे देणार? असा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील ८.५ लाखांच्या आसपास नागरिक रेशन कार्डधारक आहेत. ५० हजार लोक रेशन कार्डसाठी अपात्र (श्रीमंत) असल्याचे मानले तरी उर्वरित ३ लाख लोकांकडे रेशन कार्ड नाही. त्यातील बऱ्याच नागरिकांनी रेशन कार्डसाठी अर्जही केले आहेत, पण प्रशासकीय अडचणीमुळे अद्याप त्यांना रेशन कार्ड मिळू शकलेले नाही, तर काही नागरिकांनी दुर्लक्षितपणा किंवा अशिक्षितपणामुळे रेशन कार्ड काढलेले नाही.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे सर्व कामे ठप्प पडली. याचा फटका जिल्ह्यातील बहुतांश कुटुंबांना बसला.
त्यांची आर्थिक ओढाताण लक्षात घेऊन अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील नागरिकांसाठी आता दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले. एवढेच नाही तर तीन महिन्यासाठी प्रतिमानसी ५ किलो धान्य मोफत देण्याचाही निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करताना रेशन कार्ड नसणाऱ्यांना या योजनेत समावेश करण्याचे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे.

आधार कार्ड असणाºयांना धान्य वाटपाचा लाभ द्या
राईस मिलर्स असोसिएशनच्या वतीने मंगळवारी जिल्हा पुरवठा अधिकारी नरेंद्र भागडे यांना निवेदन देऊन जिल्ह्यातील तांदळाच्या भरडाईचा प्रश्न सोडविण्यासाठी रेशन कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांनाही शासनाच्या मोफत तांदूळ वाटप योजनेचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली. अनेक गरजू व गोरगरीबांकडे रेशन कार्ड नसल्यामुळे त्यांना धान्य मिळत नाही. अशांना आधार लिंकच्या माध्यमातून धान्य वाटप करण्याची मागणी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जेसा मोटवानी, राईस मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आकाश अग्रवाल, सचिव पुरूषोत्तम डेंगानी, नगरसेवक हरिष मोटवानी आदींनी केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी तहसीलदारांना त्यासंदर्भात निर्देश देणार असल्याचे सांगितले.

Web Title: About 30 percent of the people in the district do not have ration card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.