९७ कोटींचे कर्ज वाटप

By Admin | Updated: September 3, 2014 23:23 IST2014-09-03T23:23:03+5:302014-09-03T23:23:03+5:30

राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ९७.४७ कोटी रूपयांचे कर्जाचे वाटप केले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टापैकी ८८ टक्के कर्जाचे वाटप

9 7 crore loan allocation | ९७ कोटींचे कर्ज वाटप

९७ कोटींचे कर्ज वाटप

उद्दिष्टाच्या ८८ टक्के : राष्ट्रीयकृत बँका कर्ज वाटपात पिछाडीवरच
गडचिरोली : राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ९७.४७ कोटी रूपयांचे कर्जाचे वाटप केले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टापैकी ८८ टक्के कर्जाचे वाटप झाले आहे. महत्वाचे म्हणजे मागील वर्षीसुद्धा १६ आॅगस्टपर्यंत उद्दिष्टाच्या ८७ टक्के कर्ज वाटप करण्यात आले होते.
गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत: खरीप हंगामात धानपिकाचे उत्पादन घेतल्या जाते. कृषी विभागाच्या मार्गदर्शनानंतर जिल्ह्यातील शेतकरीवर्ग यांत्रिक पद्धतीने शेती कसू लागला आहे. त्याचबरोबर उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर करू लागला आहे. हे सर्व खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसा उपलब्ध नसल्याने कर्ज काढल्याशिवाय पर्याय उरत नाही. यापूर्वी सावकाराकडून शेतकरी कर्ज घेत होता. मात्र सावकार अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारून शेतकऱ्यांची फसवणूक करीत होता. त्यामुळे शेतकरीवर्ग लुबाडला जात होता. यातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी प्रत्येक बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात ६ राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा आहेत. सर्व राष्ट्रीयकृत बँकांना खरीप हंगामात ५२ कोटी ७३ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी या बँकांनी ३५ कोटी ४२ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ६७ टक्के एवढे आहे. ग्रामीण बँकांना दिलेल्या १२ कोटी ६५ लाख रूपये कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापैकी त्यांनी १२ कोटी ९४ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण १०२ टक्के आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांना ४४ कोटी ४२ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४९ कोटी ११ लाख रूपये एवढे कर्ज वाटप या बँकेने केले आहे. म्हणजेच कर्ज वाटपाचे प्रमाण उद्दिष्टाच्या १११ टक्के एवढे आहे.
शेतकरीवर्ग कर्ज बुडवितो, अशी चुकीची समजूत राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांची झाली असल्याने या बँका शेतकऱ्याला बँकेच्या दारात उभे राहू देत नव्हत्या. मात्र ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेला शेतकऱ्याला कर्ज वाटप करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँका आता काही प्रमाणात कर्जाचे वाटप करीत आहेत. तरीही त्यांच्याकडे शेतकऱ्यांचा पाहिजे त्याप्रमाणात ओढा असल्याचे दिसून येत नाही. राष्ट्रीयकृत बँकांपैकी बँक आॅफ इंडियाने ११ कोटी ५३ लाख, बँक आॅफ महाराष्ट्रने १२ कोटी २७ लाख, कॅनरा बँकेने २० लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडियाने ५१ लाख, आयडीबीआय बँकेने ६४ लाख, स्टेट बँक आॅफ इंडियाने ९ कोटी ८० लाख, युनियन बँक आॅफ इंडियाने ४६ लाख, असे एकूण ३५ कोटी ४२ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. कर्ज वाटपाचे प्रमाण ६७ टक्के आहे. ग्रामीण बँक व सहकारी बँकांशी तुलना करता राष्ट्रीयकृत बँकांची कर्ज वाटपाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 9 7 crore loan allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.