दुर्गम भागात ७० मोबाईल टॉवरची उभारणी होणार

By Admin | Updated: November 27, 2014 23:34 IST2014-11-27T23:34:46+5:302014-11-27T23:34:46+5:30

डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सर्व ४५६ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरसोबत जोडल्या जाणार आहेत. यामध्ये जिल्हाभरात जवळपास ७० मोबाईल टॉवर उभारले जाणार आहेत.

70 mobile towers will be built in remote areas | दुर्गम भागात ७० मोबाईल टॉवरची उभारणी होणार

दुर्गम भागात ७० मोबाईल टॉवरची उभारणी होणार

गडचिरोली : डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सर्व ४५६ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरसोबत जोडल्या जाणार आहेत. यामध्ये जिल्हाभरात जवळपास ७० मोबाईल टॉवर उभारले जाणार आहेत. या जोडणीनंतर जिल्ह्यात मोबाईल अथवा दूरध्वनी जोडणीची समस्या राहणार नाही. ही माहिती दूरसंचार विभाग गडचिरोली सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
पहिल्या टप्यात मार्च २०१५ पर्यंत ६ तहसीलमधील पंचायतींना जोडण्याचा कार्यक्रम निश्चित केला आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दूसरा टप्पा एप्रिल २०१५ पासून सुरू होणार असून मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यासोबत लेफ्ट विंग इस्टीमिझमनुसार ३७ मोबाइल टॉवर्स व फेज ७ प्रोजेक्टनुसार २१ टॉवर्सच्या निर्मितीसाठी केंद्रीय गृह व संचार मंत्रालयाकडून मंजुरी प्राप्त झाली आहे. मार्चच्या शेवटपर्यंत सर्व टॉवरचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासाठी केंद्रीय वनमंत्रालयाचीही मान्यता प्राप्त झाली आहे. टॉवरच्या निर्मितीसाठी आवश्यक निधी व यंत्रसामुग्रीसह सर्व संसाधन उपलब्ध आहेत. जमिनीची समस्या मात्र निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दूरसंचार विभागाला टॉवर उभारणीसाठी सरकारी जमीन उपलब्ध होत नाही. जी जमीन उपलब्ध होत आहे, ती अधिग्रहीत करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. जिल्हा प्रशासनाने या मुद्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यात १ लाख ७५ हजारांच्या जवळपास बीएसएनएलचे मोबाइल ग्राहक आहेत. मात्र संपूर्ण जिल्ह्यात कव्हरेजची फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, धानोरा या दुर्गम भागात बऱ्याचवेळा कव्हरेज राहत नाही.
आप्टिकल फायबरच्या माध्यमातून गडचिरोली शहरात ५ नवीन टॉवर्स व ग्रामीण भागामध्ये १६ टॉवर्स उभारले जाणार आहेत. गडचिरोली शहरात आरमोरी मार्ग, रेड्डी गोडाऊन, गोकुलनगर (आयटीआय बायपास), पोलीस अधीक्षक कार्यालय व कारगिल चौकात टॉवर उभारले जाणार आहेत.
तर ग्रामीण भागात मुलचेरा तालुक्यातील गोमणी, कोपअली, खुदीरामपली, सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका, अंकिसा, सिरोंचा, कुरखेडा तालुक्यातील कुकडी, येंगलखेडा, अहेरी तालुक्यातील उमानूर, गुड्डीगुडम, चामोर्शी तालुक्यातील नेताजी नगर, इल्लूर, मार्र्कंडादेव, कोरची तालुक्यातील बेलगाव व एटापल्ली तालुक्यातील चंद्रा येथे नवीन टॉवरची उभारणी केली जाणार आहे. एलडब्ल्यू व टप्पा ७ क्रमांकानुसार ५८ टॉवरची मान्यता आहे. मात्र जागेची कमतरता असल्याने टॉवर उभारण्यास अडचण निर्माण होत आहे, अशी माहिती दूरसंचार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 70 mobile towers will be built in remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.