६९६ घरांची पडझड
By Admin | Updated: September 9, 2014 23:27 IST2014-09-09T23:27:59+5:302014-09-09T23:27:59+5:30
१ जून ते ९ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे एकूण ६९६ घरांची पडझड झाली आहे. तसेच ३९ गोठ्यांची पडझड झाली आहे. तर अतिवृष्टीमुळे वीज पडून ५ जण तर

६९६ घरांची पडझड
सात जण दगावले : ३९ गोठ्यांची पडझड, १५ लाखांचे नुकसान
गडचिरोली : १ जून ते ९ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे एकूण ६९६ घरांची पडझड झाली आहे. तसेच ३९ गोठ्यांची पडझड झाली आहे. तर अतिवृष्टीमुळे वीज पडून ५ जण तर पुरामुळे दोन अशा एकूण ७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. अतिवृष्टीमुळे ६६ जनावरेही दगावली आहेत. एकूणच पावसाच्या महाप्रलयामुळे घरांची पडझड व जनावरांची मिळून एकूण १५ लाख ११ हजाराचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळाली आहे.
गेल्या चार-पाच दिवसात संततधार पावसाने जिल्हाभरात कहर केला. यामुळे भामरागड, सिरोंचा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. परिणामी या दोन्ही तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाताहात झाली. आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊन जिल्ह्यात एकूण २४ जनावरे दगावली. यामुळे जनावर मालकांचे १ लाख १४ हजार ४५० रूपयाचे नुकसान झाले. याच महिन्यात जिल्ह्यात ७ गोठ्यांची पूर्णत: व १११ गोठ्यांची अंशत: असे एकूण ११८ गोठ्यांची तसेच घरांची पडझड झाली. यामुळे १ लाख २० हजार ४९० रूपयाचे नुकसान झाले. आॅगस्ट महिन्यात वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात एकूण ३० जनावरे दगावली. यामुळे जनावर मालकांचे ११ लाख ६ हजार ९५० रूपयाचे नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात एकूण ३६२ घरांची तसेच गोठ्यांची पडझड झाली. यामुळे ११ लाख ५७ हजार ६६० रूपयाचे नुकसान झाले. तसेच पुरात वाहून गेलेल्या दोघाजणांना आपला जीव गमवावा लागला.
जिल्ह्यात सर्वाधिक कुरखेडा तालुक्यात १०८ घरांची पडझड झाली. तर त्या खालोखाल मुलचेरा तालुक्यात ८८ घरांची पडझड झाली. कोरची तालुक्यात ४७ घरांची पडझड झाली. अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊन ११ जण जखमी झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे गडचिरोली तालुक्यात ९ गावातील ४० घरांची अंशत: पडझड झाली. धानोरा तालुक्यातील २५ गावातील ४३ घरांची अंशत: पडझड झाली. देसाईगंज तालुक्यात ६, आरमोरी तालुक्यात ३६, चामोर्शी तालुक्यात १९४, अहेरी तालुक्यात ३३, भामरागड तालुक्यात १ घराची अंशत: पडझड झाली. अतिवृष्टीमुळे पूर्णत: घरांची पडझड झालेल्यांमध्ये धानोरा तालुक्यातील ७, देसाईगंज तालुक्यातील १, मुलचेरा तालुक्यातील २७ घरांचा समावेश आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरमालक तसेच जनावर मालकांना आणि मृतकांच्या कुटुंबीयांना व जखमी झालेल्या इसमांना आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तालुका व गावपातळीवरील सर्व महसूल कर्मचाऱ्यांना तत्काळ सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. याअनुषंगाने त्या-त्या तालुक्यातील व गावपातळीवरील तलाठी व मंडळ अधिकारी अतिवृष्टीमुळे नुकसानीचे सर्व्हेक्षण करीत आहेत. सदर नुकसानीचा अहवाल तहसील कार्यालयामार्फत जिल्हा प्रशासनाला पाठविण्याची कारवाई सुरू आहे.
अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना सानुग्रह अनुदान देण्याचे धोरण राज्य शासनाकडून राबविले जाते. यासाठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्याच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)