५३ टक्के बालकांना ‘आधार’

By Admin | Updated: July 26, 2015 02:36 IST2015-07-26T02:36:25+5:302015-07-26T02:36:25+5:30

शून्य ते पाच वयोगटातील बालकांचे आधारकार्ड काढण्याची मोहीम सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली.

53 percent of children are 'dependent' | ५३ टक्के बालकांना ‘आधार’

५३ टक्के बालकांना ‘आधार’

३९ केंद्रांवर ४९ किट सुरू : ९ लाख ३७ हजार नागरिकांना मिळाले आधारकार्ड
दिगांबर जवादे गडचिरोली
शून्य ते पाच वयोगटातील बालकांचे आधारकार्ड काढण्याची मोहीम सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात या वयाचे जवळपास ७५ हजार बालके असून मागील आठवड्यापर्यंत यापैकी ३९ हजार ६६९ बालकांचे आधारकार्ड काढण्यात आले असून हे काम निर्धारित उद्दिष्टाच्या ५३ टक्के पूर्ण झाले आहे.
प्रत्येक नागरिकाला आधारकार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्यानंतर सर्वप्रथम नागरिकांचे आधारकार्ड काढण्यात येत होते. नागरिकांचे आधारकार्ड काढण्याचे काम जवळपास ७० ते ८० टक्के पूर्ण झाल्यानंतर शासनाने शून्य ते पाच वयोगटातील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याची मोहीम मागील सहा महिन्यांपासून हाती घेण्यात आली आहे. लहान बालकांनाही शासनाकडून विविध योजनांचा लाभ दिल्या जातो. बऱ्याच वेळा काही लाभार्थी एकाच योजनेचा दोन जिल्ह्यातून लाभ घेतात. यामुळे शासनाची फसवणूक होऊन आर्थिक बोजाही सहन करावा लागतो. त्यामुळे शून्य ते पाच वयोगटातीलही बालकांचे आधारकार्ड काढण्यास सुरुवात झाली आहे.
सहा महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ७५ हजार बालके असल्याची नोंद आहे. त्यानंतर या बालकांचे आधारकार्ड काढण्याचे उद्दिष्ट ठेवून आधारकार्ड काढण्यास सुरुवात झाली. मागील आठवड्यापर्यंत सुमारे ३९ हजार ६६९ बालकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत.
गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत भिन्न आहे. त्यामुळे आधारकार्ड काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरीही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आधारकार्ड काढण्याची गती समाधानकारक आहे, असेच म्हणावे लागेल. बहुतांश गावांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे तालुकास्थळावर येऊन माहिती पाठवावी लागते. शाळा, अंगणवाडी केंद्र यामध्ये आधारकार्ड काढण्याचे केंद्र उभारले जाते. मात्र अनेक शाळांमध्ये विजेची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे आधारकार्ड काढण्याची यंत्रणा चालविण्यास अडचण निर्माण होते. अनेक नागरिकांना आधारकार्डचे महत्त्व माहीत नाही. त्यांना आधारकार्ड महत्त्व समजावून सांगावे लागते. यासारख्या अनेक अडचणी आहेत. या सर्व अडथळ्यांवर मात करून आधारकार्ड काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या १० लाख ७१ हजार ७९५ एवढी आहे. त्यातील ९ लाख ३७ हजार ४८९ नागरिकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ८७.४७ टक्के एवढे आहे.
३९ आधार केंद्र सुरू
आधारकार्ड काढण्यासाठी प्रत्येक तालुकास्थळावर एक याप्रमाणे १२ तालुक्यांमध्ये १२ स्थायी आधारकार्ड केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय २७ केंद्र अस्थायी असून त्यांच्या मार्फतीने ग्रामीण भागात तसेच शहरातील अंगणवाड्यांमध्ये फिरून आधारकार्ड काढण्यात येत आहेत. या एकूण ३९ केंद्रांवर ४९ किट सद्यस्थितीत कार्यरत आहेत. गडचिरोली जिल्ह्याला एकूण ५२ किट प्राप्त झाल्या आहेत. त्यातील दोन किटमध्ये काही तांत्रिक बिघाड आल्याने त्या बंद आहेत. त्या किटही दुरूस्त केल्या जाणार आहेत.
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत समाधानकारक कामगिरी
बहुतांश जिल्ह्यांमध्ये ७५ ते ९५ टक्क्यादरम्यान आधारकार्ड काढण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळी आहे. तरीही एकूण नागरिकांच्या ८७.४७ टक्के नागरिकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. विकसित समजल्या जाणाऱ्या सोलापूर, परभणी, पुणे या जिल्ह्यांमध्ये अजूनही आधारकार्डचे प्रमाण ८० टक्क्यांच्या खालीच असल्याचे दिसून येते. बालकांचे आधारकार्ड काढण्यासही गती मिळाली आहे.
आधारकार्ड सक्तीचे नसले तरी अत्यावश्यक आहे
आधारकार्ड नाही म्हणून कोणत्याही नागरिकाला शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यामुळे आधारकार्ड सक्तीचे नाही. मात्र आधारकार्ड नसले तर आगाऊचे कागदपत्रे नागरिकाला जोडावी लागतात. बरेच अधिकारी आधारकार्ड नसल्यास योजनेचा लाभ देण्यास विलंब करतात. या सर्व भानगडी टाळण्यासाठी नागरिकाने स्वत:चा आधारकार्ड काढणे आवश्यक आहे. बहुतांश नागरिकांना आधारकार्डचे महत्त्व अजूनही कळले नसल्याने ते आधारकार्ड काढण्यास तयार होत नाही.
भामरागड, एटापल्ली, कोरची, धानोरा या तालुक्यांमध्ये काम करताना थोडी अडचण जाणवत आहे. मात्र याच तालुक्यांमधील गरीब नागरिकांना आधारकार्डची खरी गरज असल्याने तेथील नागरिकांना आधारकार्डचे महत्त्व पटवून देऊन आधारकार्ड काढण्यात येत आहेत. आतापर्यंत ५३ टक्के बालकांचे व ८७ टक्के नागरिकांचे आधारकार्ड निघाले असले तरी १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा काम करीत आहे.
- सचिन मून, जिल्हा ई-प्रकल्प अधिकारी, गडचिरोली

Web Title: 53 percent of children are 'dependent'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.