५० भोई कुटुंबांचा रोजगार हिरावला

By Admin | Updated: June 13, 2015 01:52 IST2015-06-13T01:52:19+5:302015-06-13T01:52:19+5:30

तालुक्यातील रेगुंठा नदी घाटातून प्रवाशांची वाहतूक करण्याचा कंत्राट भोई समाजाच्या नागरिकांना न देता इतर समाजातील ठेकेदाराला देण्यात आला आहे.

50 Bhoi families are employed | ५० भोई कुटुंबांचा रोजगार हिरावला

५० भोई कुटुंबांचा रोजगार हिरावला

सिरोंचा : तालुक्यातील रेगुंठा नदी घाटातून प्रवाशांची वाहतूक करण्याचा कंत्राट भोई समाजाच्या नागरिकांना न देता इतर समाजातील ठेकेदाराला देण्यात आला आहे. त्यामुळे रेगुंठा येथील ५० भोई कुटुंबांचा रोजगार हिरावला गेला असून त्यांच्यावर स्थलांतराची पाळी आली आहे.
सिरोंचा तालुक्यात महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या मध्ये प्राणहिता नदी आहे. या नदीवर पूल नसल्याने दोन्ही राज्यातील नागरिकांना नदीच्या पाण्यातूनच प्रवास करावा लागतो. या प्रवाशांची वाहतूक रेगुंठा येथील भोई समाजाचे कुटुंब (आडेवार नावाडी) करीत आहेत. हा परंपरागत व्यवसाय स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. प्रवाशांकडून मिळणाऱ्या पैशावर या कुटुंबांची उपजीविका सुरू आहे.
शासनाच्या धोरणानुसार नदी घाट चालविण्याचा मागील वर्षीपासून लिलाव करण्यात येत होता. गावातील भोई समाजातील नागरिकांची संख्या लक्षात घेऊन याच समाजातील नागरिकांना सरकारी किमतीवर सदर घाट उपलब्ध करून दिला जात होता. यावर्षीही रेगुंठा घाटाचा लिलाव करण्यात आला. निविदेत दिलेल्या सुचनेप्रमाणे या समाजाचे प्रमुख ५०० रूपये अनामत रक्कम व अर्ज भरून उपस्थित होते. परंतु लिलावातील अधिकाऱ्यांनी वेळेवर लिलाव नियमात बदल करून पाच हजार रूपयांचा भरणा करण्याचे सांगितले. पाच हजार रूपयांची वेळेवर जमवाजमव न झाल्याने सदर लिलाव दुसऱ्या ठेकेदारास देण्यात आला आहे. त्यामुळे येथील ५० कुटुंबांचा रोजगार हिरावला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. रेगुंठा येथील काही भोई कुटुंबावर स्थलांतर करण्याचीही पाळी आली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 50 Bhoi families are employed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.