४६ ग्राम पंचायती अव्वल

By Admin | Updated: April 27, 2017 01:10 IST2017-04-27T01:10:31+5:302017-04-27T01:10:31+5:30

सन २०१६-१७ या वर्षात ग्राम पंचायतीच्या गृहकर वसुलीत भामरागड तालुका अव्वल ठरला आहे.

46 gram panchayat tops | ४६ ग्राम पंचायती अव्वल

४६ ग्राम पंचायती अव्वल

१०० टक्के गृह कर वसुली : एटापल्ली, भामरागड तालुका आघाडीवर
गडचिरोली : सन २०१६-१७ या वर्षात ग्राम पंचायतीच्या गृहकर वसुलीत भामरागड तालुका अव्वल ठरला आहे. या तालुक्यातील सर्वच १९ ग्राम पंचायतीने १०० टक्के कर वसुली केली आहे. एटापल्ली तालुक्यातील २७ ग्राम पंचायतींनी १०० टक्के कर वसुली करून आघाडी घेतली आहे. पाणी कर वसुलीत कोरची व भामरागड तालुक्याने आघाडी मिळविली असून १०० टक्के कर वसुली ३१ मार्च २०१७ पर्यंत केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४५६ ग्राम पंचायती आहेत. या सर्व ग्राम पंचायतीची मागील थकबाकी व सन २०१६-१७ या चालू वर्षाची मिळून एकूण १४ कोटी ७४ लाख ८२ हजार ७९० रूपये गृह कराची मागणी होती. ग्राम पंचायतीच्या ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंत एकूण १० कोटी ८८ लाख ४० हजार २२ रूपयांची कर वसुली केली. या गृहकर वसुलीची सरासरी टक्केवारी ७३.८० आहे. गडचिरोली तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीची गृहकर वसुलीची यावर्षीची टक्केवारी ७१ आहे. आरमोरी तालुक्यातील ३३ ग्राम पंचायतीची गृहकर वसुलीची टक्केवारी ६७ आहे. देसाईगंज तालुक्यातील १९ ग्राम पंचायतीची गृहकर वसुली ६९ व कुरखेडा तालुक्यातील ग्राम पंचायतीची गृहकर वसुलीची टक्केवारी ६९ आहे. कोरची तालुक्यातील २९ ग्राम पंचायतीने ९० टक्के गृहकर वसुली केली असून धानोरा तालुक्यातील ६१ ग्राम पंचायतीने ७९.२९ टक्के गृहकर वसुली केली आहे.
चामोर्शी तालुक्यातील ७५ ग्राम पंचायतीची गृहकर वसुली ७८ टक्के असून मुलचेरा तालुक्यातील १६ ग्राम पंचायतीची गृहकर वसुली ७६.४४ टक्के आहे. अहेरी तालुक्यातील ३९ ग्राम पंचायतीने यावर्षी ६७ टक्के गृहकर वसुली केली असून सिरोंचा तालुक्यातील ३९ ग्राम पंचायतीच्या गृहकर वसुलीची टक्केवारी ७७ आहे.
एटापल्ली तालुक्यात एकूण ३१ ग्राम पंचायती आहेत. या सर्व ग्राम पंचायतीच्या गृहकर वसुलीची सरासरी टक्केवारी ८९.२७ आहे. विशेष म्हणजे एटापल्ली तालुक्यातील २७ ग्राम पंचायतीने १०० टक्के कर वसुली करून आपले उद्दिष्ट गाठले आहे. भामरागड तालुक्यातील सर्वच १९ ग्राम पंचायतींनी १०० टक्के गृहकर वसुली यावर्षात केली आहे. भामरागड तालुक्यातील १९ ग्राम पंचायतीची मागील थकबाकी व चालू वर्षाची मिळून एकूण २५ लाख ३ हजार ६९८ रूपये गृहकराची नागरिकांकडे मागणी होती. भामरागड तालुक्यातील ग्राम पंचायतीने २५ लाख ३ हजार ६९८ रूपये गृहकराची वसुली केली आहे. एटापल्ली तालुक्यातील ३१ ग्राम पंचायतीची मागील थकबाकी व चालू वर्षाची मिळून एकूण ३५ लाख ६७ हजार ४७८ रूपये गृहकराची मागणी होती. यापैकी ग्राम पंचायतींनी ३१ लाख ८४ हजार ५९९ रूपयांची गृहकर वसुली केली आहे. सन २०१६-१७ मध्ये शहरी भागातील ग्राम पंचायती गृह व पाणी कर वसुलीत प्रचंड पिछाडीवर असल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)

पाणी कर वसुलीत कोरची तालुका पुढे
पाणी सुविधेपोटी प्रत्येक ग्राम पंचायत ग्रामस्थांवर दरवर्षी पाणी कराची आकारणी करते. सदर पाणी कराची १०० टक्के वसुली करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले होते. ३१ मार्च २०१६ अखेरपर्यंत जिल्ह्याच्या भामरागड व कोरची या दोन तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतींनी १०० टक्के पाणी कर वसुली केली आहे. शहरी भागातील ग्राम पंचायती पाणी कर वसुलीत माघारले आहे. गडचिरोली तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतींची पाणी कर वसुलीची टक्केवारी ६८.९७ आहे. आरमोरी तालुक्यातील ३३ ग्राम पंचायतीने ६८.२० टक्के पाणी कर वसुली केली आहे. देसाईगंज तालुक्यातील १९ गाम पंचायतीची पाणी कर वसुली ६४.६५ टक्के आहे. कुरखेडा तालुक्यातील ४४ ग्राम पंचायतीने ७०.३६ टक्के, धानोरा तालुक्यातील ६१ ग्राम पंचायतीने ७६ टक्के, चामोर्शी तालुक्यातील ७५ ग्राम पंचायतीने ७६ टक्के पाणी कर वसुली केली आहे. मुलचेरा तालुक्यातील १६ ग्राम पंचायतीच्या पाणी कर वसुलीची टक्केवारी ६२.८५, अहेरी तालुक्यातील ३९ ग्राम पंचायतीची पाणी कर वसुलीची टक्केवारी ६९ टक्के आहे. एटापल्ली तालुक्यातील ३१ ग्रा. पं. ची ९५ टक्के तर सिरोंचा तालुक्यातील ३९ ग्रा. पं. ची ७८ टक्के पाणी कर वसुली आहे.

 

Web Title: 46 gram panchayat tops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.