४० टक्के महिला निरक्षर
By Admin | Updated: September 9, 2014 23:30 IST2014-09-09T23:30:03+5:302014-09-09T23:30:03+5:30
नागरिकांना साक्षर करण्यासाठी शासनाकडून व स्वयंसेवी संस्थाकडून विविध उपक्रम आजपर्यंत राबविण्यात येत असले तरी जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के महिला निरक्षर असल्याचे प्रशासनाकडे असलेल्या

४० टक्के महिला निरक्षर
गडचिरोली : नागरिकांना साक्षर करण्यासाठी शासनाकडून व स्वयंसेवी संस्थाकडून विविध उपक्रम आजपर्यंत राबविण्यात येत असले तरी जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के महिला निरक्षर असल्याचे प्रशासनाकडे असलेल्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. पुरूषांच्या साक्षरतेचे प्रमाणसुद्धा फारसे समाधानकारक नसून जिल्ह्यात सुमारे २० टक्के नागरिक निरक्षर आहेत.
शिक्षणाशिवाय देशाचा विकास होणार नाही, ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सरकारने प्रत्येक बालकाला शिक्षण मिळेल याची व्यवस्था केली. ‘गाव तिथे शाळा’ सुरू केली. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी शिष्यवृत्ती, मध्यान्ह भोजन, मोफत गणवेश, पुस्तके आदी सवलती सुरू केल्या. याचा सकारात्मक परिणाम मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. जे नागरिक वयस्क आहेत, अशा नागरिकांसाठी शासनामार्फत निरंतर प्रौढ शिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. या वर्गातून हजारो नागरिक साक्षर झाले आहेत. तरीही १०० टक्के नागरिकांना साक्षर करण्यात अजूनपर्यंत यश प्राप्त झालेले नाही.
२०११ च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १० लाख ७२ हजार ९४२ एवढी आहे. यामध्ये पुरूषांची लोकसंख्या ५ लाख ४१ हजार ३२८ तर महिलांची लोकसंख्या ५ लाख ३१ हजार ६१४ एवढी आहे. पुरूषांच्या साक्षरतेचे प्रमाण ८०.०२ टक्के तर महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण केवळ ६०.०७ टक्के एवढे आहे.
तालुकानिहाय साक्षरतेमध्ये देसाईगंज तालुक्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामध्ये ८९.७१ टक्के पुरूष तर ७१.६९ टक्के महिला साक्षर आहेत. सर्वाधिक कमी साक्षरता भामरागड तालुक्यात आहे. यामध्ये ५३.५७ टक्के पुरूष तर ३४.४९ टक्के महिला साक्षर आहेत. गडचिरोली तालुक्यात एकूण साक्षरतेचे प्रमाण ७९.०१ टक्के एवढे आहे. यामध्ये ६९.७५ टक्के स्त्रिया व ८७.९२ टक्के पुरूषांचे प्रमाण आहे. आरमोरी तालुक्याची एकूण साक्षरता ७६.०३ टक्के एवढी आहे. यामध्ये पुरूषांचे प्रमाण ८६ टक्के तर महिलांचे प्रमाण ६५.८५ टक्के एवढे आहे. कुरखेडात ८८.३३ टक्के पुरूष साक्षर आहेत. तर ६९.०४ टक्के महिला साक्षर आहेत. कोरची तालुक्यात ८०.३८ टक्के पुरूष तर ५९.८९ टक्के महिला साक्षर आहेत. धानोरा तालुक्यात ७७.०७ टक्के पुरूष व ५५.५९ टक्के महिला साक्षर आहेत. चामोर्शी तालुक्यात ८२.०३ टक्के पुरूष तर ६१.६५ टक्के महिला साक्षर आहेत. मुलचेरा तालुक्यात ८४.७८ टक्के पुरूष तर ६५.८२ टक्के महिला साक्षर आहेत. अहेरी तालुक्यात ७४.३८ टक्के पुरूष तर महिलांचे साक्षरतेचे प्रमाण ५५.९२ टक्के एवढे आहे. एटापल्ली तालुक्यात पुरूष साक्षरतेचे प्रमाण ६८.०५ टक्के तर महिलांचे प्रमाण ४९.३६ टक्के एवढे आहे. सिरोंचा तालुक्यात ६७.७८ टक्के पुरूष तर ४६.२३ टक्के महिला साक्षर आहेत. जिल्ह्यात महिला व पुरूषांच्या एकूण साक्षरतेचे प्रमाण केवळ ७०.०६ टक्के एवढे आहे.
एक पुरूष सुशिक्षीत झाला तर त्याचा फायदा केवळ त्यालाच होतो. मात्र महिला साक्षर झाली तर त्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होतो. मात्र समाजातील चुकीच्या चालीरितीमुळे मुलींना शाळेत पाठविले जात नाही. त्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात पुरूषांच्या तुलनेत महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण सुमारे २० टक्क्यांनी कमी आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. शासनाने मुलींच्या शिक्षणाला विशेष प्राधान्य देत त्यांच्यासाठी मोफत बससेवा, मोफत प्रवेश, सायकल वाटप यासारख्या उपाययोजना योजल्या आहेत. तरीही मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)